पृष्ठे

गुरुवार, ११ डिसेंबर, २०१४

आपला पूर्वग्रहदूषित समाज

कोणतीही घटना घडली की निष्कर्षावर येण्याची घाणेरडी सवय आपल्याला लागलेली आहे. आपली माध्यमेसुद्धा पूर्वग्रह दुषित आहेत किंबहुना त्यांचा एक रंगीत चष्माच आहे आणि त्यातूनच ते सगळ्या घटनांकडे पाहतात आणि त्याच रंगाने सगळ्या घटना रंगवतात. आणि सोशल मिडियासुद्धा या पूर्वग्रहापासून मुक्त कसा राहील? तिकडेसुद्धा ही लागण पोहचलीच. खालची दोन उदाहरणं अगदी बोलकी आहेत. 

उदाहरण एक: जावखेडा हत्याकांड 
मागच्या ऑक्टोबर महिन्यात नगर जिल्ह्यातल्या जावखेडा इथे एका दलित कुटुंबातल्या तीन जणांची हत्या झाली आणि एका सुरात मिडिया आणि तथाकथित पुरोगामी यांनी ओरडायला सुरुवात केली की यामागे (तथाकथित) उच्चवर्णीयांचा हात आहे. म्हणजे मागचा पुढचा विचार न करता सगळ्यांनी जणू हे गृहीतच धरलं होतं की यामागे नक्कीच उच्चवर्णीयांचा हात असणार. आणि नंतर तपासात जे पुढे आलं ते य गृहितकाला फाटा देणारं होतं. या हत्याकांडात दलित हा शब्द अधोरेखित करण्यात आला होता. केवळ याच नाही तर दलितांशी निगडीत कोणत्याही घटनेत दलित हा शब्द अधोरेखितच असतो आणि दलित हेच नेहमी पिडीत आणि सवर्ण हेच गुन्हेगार हे साधारण गृहीतकच आहे नाही का. म्हणजे दलितांचा कैवार घेतल्याशिवाय तुम्ही पुरोगामी कसे होणार ना? त्यामुळे मग करा दलितांना अधोरेखित.  मग जेव्हा एखाद्या दालीताचा खून होतो, किंवा एखाद्या दलित महिलेवर बलात्कार होतो तेव्हा हे गृहीतक आपोआपच लागू केलं जातं आणि पुढची सगळी सिद्धता याच गृहितकाभोवती फिरते. मग सगळे सवर्णांना, त्यांच्या परंपरांना, त्यांच्या रूढींना अगदी त्यांच्या धर्मालासुद्धा वाट्टेल ती दुषणे देऊन मोकळे होतात. एखाद्या समाजावर पिढ्यानपिढ्या झालेला अन्याय दूर करण्यासाठी आज दुसऱ्या समाजावर अन्याय करावाच लागणार, नाही का? त्याशिवाय समाजाची पापं कशी धुतली जाणार, नाही का?  

उदाहरण दोन  
मागे रोहतकच्या दोन बहिणींचा एक व्हिडीओ मिडीयाने अक्षरशः उचलून धरला. त्यात त्या दोघीजणी एक की दोन मुलांना पट्ट्याने मारत असल्याचं चित्रण होतं. सोशल मिडियावरसुद्धा त्या व्हिडीओला कित्येक शेअर्स आणि लाईक्स मिळाले. त्यानंतर त्याची दुसरी बाजू बाहेर आली तेव्हा आणि आता असं दिसतंय कि यात त्या बिचाऱ्या मुलांचा काहीच दोष नव्हता. इथेही एक गृहीतक आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळतं ते असं की जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यात वाद असतो तेव्हा गुन्हा हा पुरुषाचाच असतो. इथेही तेच… स्त्रीवाद म्हणजे पुरोगामीपणा अशी अजून एक व्याख्या झाली आहे ना आज आणि आपण कसे आणि किती पुरोगामी हे दाखवण्याची एक स्पर्धा सगळीकडेच दिसत आहे. 

वरच्या दोन उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे ती अशी की आपण, आपला अख्खा समाज, आपल्या सगळ्या यंत्रणा हे पूर्वग्रहाने पछाडलेले आहेत. म्हणजे पहा की दलित आणि सवर्ण यांत सवर्णच दोषी असणार, स्त्री आणि पुरुष यांत पुरुषच दोषी असणार, गरीब आणि श्रीमंत यांत श्रीमंतांनाच मज चढलेला असणार, सायकलस्वार आणि करचालक यांत कारचालकच दोषी असणार, नाही का? अगदी याच गृहीतकांवर आपले कायदे सुद्धा आधारित आहेत. शेवटी दुसरी बाजू इथे पहायचीय कुणाला? एका आणि एकाच बाजूचे आम्ही पुरस्कर्ते आणि तेच आमच्या सोयीचं आहे ना. त्याशिवाय आम्हांला पुरोगामी कोण म्हणणार? 

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

मी काही लई भारी लिहितो असा दावा करत नाही पण कधी कधी असं होतं कि मी माझाच ब्लॉग जेव्हा वाचतो तेव्हा एखादी चांगली पोस्ट वाचून वाटतं कि 'अरेच्चा, हे मी लिहिलंय?  कसं काय सुचलं बुवा आपल्याला हे?' पण असं जेव्हा वाटतं तेव्हा थोडासा आनंदही होतोच. आणि का नाही होणार? आपले विचार नेमक्या शब्दांमध्ये गुंफता येणं हे आनंददायीच असतं. ते नेहमीच जमतं असं नाही. कधी कधी शब्दांची ओढाताणही करावी लागते. असे ओढाताण करून लिहिलेले कित्येक ड्राफ्ट  ब्लॉगवर पडून आहेत. 

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

वास्तव आणि अवास्तव

आपल्या अपेक्षा आपल्या इगोचंच प्रतिबिंब नसतात का? निदान मला तरी तसं वाटतं. नाहीतर स्वतःच स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत कोण कशाला पडतो? पण वास्तव आणि अवास्तव अपेक्षा यांच्यातली सीमारेषा कुठेय? निदान ती निश्चित करून घेतली पाहिजे… पण आपला इगो पण बडी कमाल की चीज है भाई. स्वस्थ बसू देईल तर शपथ. अर्धा असलेला ग्लास पूर्ण भरल्याशिवाय चैन नाही. आणि याहून विशेष म्हणजे हे सगळं कळतं हो पण वळत नाही ना. 

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

आदर्शवाद

तुम्हांला वाटतं का की आपण आदर्शवादाच्या फारच आहारी गेलो आहोत? संस्कृती, परंपरा, धर्म वगैरेंच्या नावाखाली खोट्या समजुतींना घट्ट धरून बसलो आहोत? आम्हांला प्रत्येक पुरुष हा मर्यादापुरुषोत्तम राम आणि प्रत्येक स्त्री ही सीता असावी असं वाटतं. आम्हांला अगदी आदर्श नागरिक हवे असतात. लहानपणापासून प्रत्येकानेच कसं आदर्श असलं पाहिजे याचे पाठ पढवले जातात. घरी दारी शाळेत अगदी सगळीकडेच. कुणी एखादा चुकला कि राईचा पर्वत करून त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण केला जातो. मग लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच या खोट्या आदर्शवादाच्या भोवऱ्यात सापडून वाहत जातात. ते कधी वर येतच नाहीत. हा आदर्शवाद पिढ्यानपिढ्या तसाच पुढे पसरत जातो. आम्ही आमच्या महापुरुषांमध्येही देवाचा अंश शोधत बसतो. त्यामुळे त्यांचं माणूस असणंच नाकारतो आणि मग त्यांच्या चुकाही साहजिकच नाकारतो. किंबहुना त्यांना चुका करण्याची मुभाच देत नाही. पण माणसाला देव करण्यापेक्षा त्याला माणूस म्हणून त्याच्या चुकांसाहित स्वीकारायला आपला समाज कधी शिकणार? 'आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही' असं सांगताना कित्येक आई वडिलांची छाती अभिमानाने फुलून येते पण त्या मुलाच्या इच्छेचं काय? त्याच्या स्वप्नांचं काय? इथे मतभेद असण्याची शक्यताच मुळी नाकारली जाते. अशा सतत आदर्शांच्या दडपणात जागणाऱ्या समाजात कोण कसं सुखी होणार? 

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

हैदर

हैदर एक चांगली कलाकृती आहे. पण त्यामध्ये भारतीय सैन्याचं जे चित्रण केलंय ते मात्र धडधडीत खोटं आहे आणि फुटीरवाद्यांना सपोर्ट करणारं आहे. मला एक गोष्ट कळत नाही की बॉलीवूडवाले फुटीरवाद्यांच्या एवढं का प्रेमात पडलेत. इतकंच प्रेम उफाळून येत असेल तर पाकिस्तानात जाऊन चित्रपट बनवा आणि तिकडेच प्रदर्शित करा. हे म्हणजे भारताच्या तुकड्यांवर जगायचं आणि पाकचे गुणगान गायचे असं झालं. फक्त बॉलीवूडवालेच नाही तर अरुंधती रॉयसारखे तथाकथित पुरोगामीसुद्धा हाच सूर आळवतात. म्हणजे त्यांच्या आणि नवाझ शरीफ वगैरेंच्या विचारांत किती एकवाक्यता असते पहा. नवाझ शरीफ यांचं मागे संयुक्त राष्ट्रामध्ये जे भाषण झालं अगदी त्याचा प्रतिध्वनी वाटावा असा हैदर हा चित्रपट आहे. हे असं का हो ? ज्या भारतीय सैन्याने पुराच्या थैमनतुन काश्मिरींना वाचवलं, जे भारतीय सैन्य दिवस रात्र डोळ्यात तेल घालून यांचं आणि देशाचं रक्षण करतं त्याच सैन्याचं असं चित्रण करून काय साधायचंय यांना? कि काहीतरी वादग्रस्त केल्याशिवाय यांचं समाधान होतच नाही? हा सरळ सरळ देशद्रोह नाही तर काय आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे जे काय असेल ते असेल हो, पण अभिव्यक्तीच्या नावाखाली तुम्ही जो खोटेपणाच बोंबलून जगाला सांगता आणि फुटीरवाद्याचं जे गलिच्छ उदात्तीकरण करता त्याचं काय? Hamletवर चित्रपट बनवायला यांना काश्मीरची पार्श्वभूमी का घ्यावी लागते ते काळात नाही बुवा. यांचं फंडिंग अल कायदा किंवा तत्सम दहशतवादी संघटनांकडून होत असणार. अन्यथा कोणत्या देशातले लोक त्यांच्याच देशाचं असं demeaning portrait रंगवतात.

बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४

स्थितप्रज्ञ

(आमच्या एका फोन संभाषणाचा हा सारांश)

आनंदाच्या हजार क्षणांपेक्षा दुःखाचा, उद्वेगाचा, वेदनेचा एक क्षण माणसाला स्थितप्रज्ञतेच्या जवळ घेऊन जातो. माणसानं स्थितप्रज्ञ असावं की नसावं हा कदाचित वादाचा मुद्दा असू शकतो, पण 'कठीण समय येता' स्थितप्रज्ञ वृत्ती कधीही चांगली असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि तसा अनुभवसुद्धा आहे. 'पण त्यासाठी दुःख भोगलंच पाहिजे का' हाही युक्तिवाद अगदी मान्य. पण आयुष्यात नेहमीच सुख येत नाही हेही सत्य आहे. शेवटी काय तर 'समलोष्टाश्मकांचन' हे महत्त्वाचं. 

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

एक टोक आहे ते म्हणजे मनात येईल ते करायचं , कसलाही विचार न करता बेधडक उडी मारायची, हवी ती स्वप्नं पाहायची आणि त्यांचा पाठलाग करायचा. दुसरं टोक आहे ते म्हणजे आपल्या मर्यादा ओळखून स्वप्नं पहायची, किंबहुना स्वप्नांना सुद्धा कुंपण घालून ठेवायचं, आपण काय करू शकतो आणि काय नाही ते साधा प्रयत्नसुद्धा न करताच ठरवून टाकायचं, काही गृहितकं मनात घेउनच आपली वाट चालायची. आणि आपण बहुतेक वेळा या दोन टोकांच्या मध्यावर लटकत राहतो आणि आपलं जीवनसुद्धा तसंच लटकत राहतं. स्वप्नं तर मोठी पाहतो पण त्यांचा पाठलाग करायची हिंमत आपल्यात नसते. अनोळखी प्रदेशात पाऊल ठेवायलासुद्धा घाबरतो आपण. आपल्याला थ्रिल हवं असतं पण सुरक्षेचं कवच पांघरूनच. कसलं विरोधाभासी वास्तव आहे, नाही का? 

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

युद्ध...स्वतःशी

आपल्यापैकी प्रत्येक जण रोजच युद्ध लढतो आहे… स्वतःशी, परिस्थितीशी… कधी विजय होतो तर कधी पराजय … या युद्धात नेहमीच जिंकणं अपेक्षित नाही…पण दोन्हीही स्वीकारायला शिकणं महत्त्वाचं आहे … किंबहुना जय पराजय यांच्याही पलीकडे जाऊन रणांगणात टिकून राहणं महत्त्वाचं आहे… अगदी समोर पराभव दिसत असला तरीही… आजचा पराभव विसरून उद्याच्या लढाईची तयारी करणं हाच खरा पुरुषार्थ 

रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

आपण जिथे आहोत तिथून इतरांची आयुष्यं किती सुंदर दिसतात, नाही का? दुरून डोंगर साजरेच दिसतात. जवळून पाहिल्यावरच कळतं की किती काटे कुटे आणि खाच खळगे आहेत ते. आपल्या सुखाच्या कल्पनाही कधी कधी किती उथळ असतात. खूप मोठी झेप घ्यावीशी वाटते. पण छोटी छोटी पावले टाकण्यातही आनंद असतोच की. 

शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

व्यक्ताव्यक्त

व्यक्त होणं, व्हावसं वाटणं ही माणसाची गरज आहे. आपली सुख दुःखं, आपल्या व्यथा, आपल्या चिंता, आपल्या अचिव्हमेंट्स इतरांसोबत शेअर करावसं वाटणं स्वाभाविक आहे. पण मनातलं सगळंच कुठं व्यक्त करता येतं. काही गोष्टी शब्दांअभावी मनातच राहतात तर काही शब्द गवसूनसुद्धा बाहेर पडत नाहीत. माणसानं आपलं मन रितं केलं पाहिजे असं कुणी कितीही म्हटलं तरीही ते शक्य आहे का? खरं तर व्यक्त न करता येण्यासारख्या कित्येक गोष्टींनी मन भरून गेलेलं असतं. आणि ते रितं करू म्हटल्याने काही रितं होत नाही. मुख्य म्हणजे कुणाकडे व्यक्त व्हायचं ? हे जग, आपल्या अवती भवतीची माणसं किती उथळ आहेत हे पाहिल्यावर तर मनातल्या गोष्टी मनातच राहिलेल्या बऱ्या असं वाटतं. इतरांनी आपल्याला समजून घेतल्यवर मिळणाऱ्या सुखापेक्षा त्यांनी गैरसमज करून घेतल्यावर वाटणारं दुःख भयंकर असतं. 

शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

सुविचार

शाळेत असताना बोर्डावर सुविचार लिहायची जबाबदारी बहुतेक वेळा माझी असायची. तेव्हा फक्त ते सुविचार लिहायचो, त्यांचा अर्थ कळायचा पण त्यांचं महत्त्व नाही कळायचं कारण तेवढं जगच पाहिलं नव्हतं, तेवढा अनुभव गाठीशी नव्हता. पण आता थोडंफार जग पाहिलंय आणि थोडाफार अनुभव गाठीशी आहे तेव्हा काही सुविचारांचा अर्थ खऱ्या अर्थाने उलगडत आहे. खरं तर सुविचार म्हणजे कुणाचे ना कुणाचे अनुभवच नाही का? शब्दांत गोठलेले,थिजलेले . जोपर्यंत अनुभवाची झळ तुम्हांला लागत नाही तोपर्यंत ते तुमच्यासाठी फक्त थिजलेलेच राहणार. 

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

हिंदू

सगळी माणसं सारखीच आहेत यात काही वादच नाही , पण हे हिंदूंसोबतच इतरांनीही शिकायला हवंच. विशेषतः ज्यांना आपलाच धर्म श्रेष्ठ आणि एकमेव सत्य वाटतो त्यांनी. आणि राहता राहिला प्रश्न हिंदू या शब्दाचा. तर त्याचं मूळ काहीही असलं तरी आता हिंदू ही आपली ओळख झाली आहे. हिंदू शब्द नसता तरीही या धर्माला इतर कुठल्या तरी नावाने ओळखले गेले असतेच. आणि हिंदू नावाखाली जर वेगवेगळे भारतीय संप्रदाय एकवटले नसते तर आज त्यांचेच कित्येक धर्म झाले असते. कुणी शैव, कुणी वैष्णव, कुणी आणखी काही. मुळात "एकम सात विप्राः बहुधा वदन्ति" हीच हिंदू धर्माची विचारसारणी राहिलेली आहे नेहमीच. तुम्ही कोणा एका देवाला भजता किंवा कोण्या एका प्रेषिताला मानता म्हणून तुम्ही हिंदू अशी हिंदू धर्माची ओळख नाही हाच हिंदू धर्माचा मोठेपणा नाही का वाटत? मी हिंदू असूनसुद्धा नास्तिक असू शकतो ही हिंदू असण्यातली चैन नाही का? Authoritarian नसणं हे हिंदू धर्माचं बलस्थान नाही का वाटत? द्वैत अद्वैत, विशिष्ठाद्वैत यांच्यासोबत चार्वाकनीतीलाही फक्त हिंदू धर्मातच स्थान मिळू शकतं. मला वाटतं हिंदू धर्मात जर काही वाईट असेल तर ते एकच - जातीभेद. 

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

१४ जून २०१३

(माझ्या ब्लॉगवर काही अर्धवट पोस्ट्स आहेत. ही त्यांपैकीच एक. १४ जून २०१३ रोजी लिहिलेली. आता ती पूर्ण करण्याची शक्यता नाही कारण ते फिलिंग परत येणे शक्य नाही. म्हणून तशीच अर्धवट पोस्ट.)

बाहेर कसला मस्त मोसम आहे राव. आणि मी हे असलं काय बोअरिंग करत बसलोय. आणि इथे जाम कंटाळा आलाय राव labमध्ये बसून बसून. एक शोध निबंध (रिसर्च पेपर ) वाचूनच डोक्याचा पार खुळखुळा झालाय. आजचा विचारांचा कोटा संपलाय आणि आज तरी नवीन काही आयडिया उगवेलसं वाटत नाही. नुसती खिचडी झालीय डोक्यात. मी प्रॉब्लेमच्या जवळ असल्यसारखं वाटतंय. तसं आतापर्यंत ते बऱ्याच वेळा वाटलंय. असो. तर पाऊस… पावसाळ्यात एक खास मूड तयार होतो. अशा वेळी सगळं सोडून घरी असावं किंवा या पावसाचा मनमुराद आनंद घेत कुठेतरी निवांत ठिकाणी असावं…  अगदी कुठेही चालेल पण इथे नको. मनसोक्त जगावंसं वाटतं. खूप काही लिहावंसंसुद्धा वाटतं. कविता सुचायला लागतात. आठवणी दाटायला लागतात. सगळंच मस्त मस्त वाटायला लागतं. "श्रावण मासी, हर्ष मानसी…' अशी अवस्था होते. 

सोमवार, १४ जुलै, २०१४

असाच एक विचार

जसजशी रात्र चढत जाते डोक्यातले विचार कमी होत जातात आणि शेवटी कुठल्या तरी एका विचाराभोवती अस्तित्व फिरत राहतं. तो एकच एक विचार भारावून टाकतो. काहीतरी गवसल्याचा साक्षात्कार होतो. आयुष्याला दिशा मिळाल्याचा साक्षात्कार होतो. मग त्या विचाराने भारावून झोपेच्या स्वाधीन होतो. केव्हा झोप लागते कळतही नाही . स्वप्नांमध्ये त्या विचाराचा लवलेशही नसतो आणि सकाळ होईपर्यंत तर झोपेच्या तळी तो विचारच गाडला जातो. आणि मग सकाळी एवढंच आठवतं की एका विचाराने आपण रात्री भारावून गेलो होतो आणि प्रश्न पडतो की का? तो विचार इतका उदात्त होता की ती रात्र इतकी गहिरी होती? नेहमीप्रमाणे उत्तर मिळत नाहीच. आयुष्याला अशा विचारांतून कित्येक दिशा गवसल्या आहेत आणि कित्येक मार्ग सापडले आहेत. काही मार्ग क्रमिले आणि काही वळणे मागेच सोडावी लागली. सगळ्याच वाटा काही आपल्यासाठी नसतात. त्या फक्त तिथे असतात, कधीतरी एखादा पर्याय म्हणून. बाकी आपले राजमार्ग आपण ओळखायचे असतात. किंबहुना आपण ज्या मार्गावर चालतोय तोच आपला राजमार्ग म्हणायचा असतो. 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

रविवार, ६ जुलै, २०१४

भय इथले संपत नाही



मी अजून अर्धंच अंतर पार केलेलं होतं. तसा मला निघायला उशीरच झाला होता. आता दिवस मावळतीकडे चालला होता आणि मला अजून बरंच अंतर जायचं होतं. साधारण एक दीड तास तरी लागणार होता इथून गावात पोहचायला. आणि गावात जायला या वेळी काही वाहन भेटणार नाही याची कल्पना होती. पायी चालत जायचं असा निश्चय करूनच आलो होतो. निदान सायकल आणायला हवी होती असं आता वाटत होतं. जसा सूर्य क्षितिजाआड जायला लागला तशी हिरवी झाडं काळी व्हायला लागली. त्या झाडांच्या भल्या भयानक लांब सावल्या भयावह वाटायला लागल्या. रेल्वेपटरीच्या जवळच्या वळणावर आलो तेव्हा सगळीकडे अंधारलं होतं. त्या वळणावरची निलगिरीची झाडं भयंकर दिसत होती. पूर्ण रस्ताच सुनसान. माणसाचा दूरदूरपर्यंत कुठेच मागमूस नव्हता. दिवसा डोळ्यांना सुखावणारी दोन्ही बाजूंची हिरवी शेतं आता काळीकुट्ट दिसत होती. रातकिड्यांचा आवाज सतत background music सारखा चालू होता. एक मिनिटसुद्धा मोठा वाटत होता. पूर्वी कधीतरी ऐकलेल्या भूत प्रेताच्या गोष्टी मनात थैमान घालत होत्या. हृदयाचे ठोके भयंकर वाढले होते. आकाशात चंद्रकोरसुद्धा ढगांआड गेली असल्याने काळोख अजूनच गहिरा दिसत होता. माझी पंचेंद्रिये एकदम अलर्ट झाली होती. सतत कुणीतरी माझा पाठलाग करतंय असं अधून मधून वाटत होतं आणि अंगावर सर्रकन काटा येत होता. पण मी फक्त पुढे पाहून चालत होतो कारण मागे पहायची हिंमतच होत नव्हती. मागेच काय आजूबाजूलासुद्धा पहायची हिंमत होत नव्हती. मनात हनुमान चालीसा म्हणत होतो. तरीही भीती वाटत होती. भितीपुढे श्रद्धा कमकुवत पडते का ? की आपली श्राद्धाच मुळात कमकुवत असते? एखादं कुत्रं जरी जवळून गेलं तरी मला बरं वाटत होतं. या क्षणी चोर-दरोडेखोरांनी आडवलं असतं तरीही मला आनंदच झाला असता. आता फक्त आणि फक्त गाव जवळ करायचा होता. या मृत काळ्याकुट्ट शांततेपासून दूर जायचं होतं. मनातले विचार काही थांबायला तयार नव्हते. आजूबाजूची सळसळसुद्धा काळजाचं पाणी करून जात होती. किती अंतर पार केलं याचा काही हिशेब नव्हता. मग थोड्याच वेळात दूर अंतरावर लुकलुकते दिवे दिसले आणि गाव जवळ आल्याचं वाटून थोडं बरं वाटलं. मग गावाच्या शिवारात आल्यावर एखाद दुसरा माणूस भेटत होता. आता फार बरं वाटत होतं. काही वेळातच तो गडद अंधार आणि तो गडद प्रहर भेदून मी शेवटी गावात पोहचलो आणि एका भयंकर काळ्या प्रवासाचा अंत झाला. भीती आपल्या मनातच असते पण तरीही आपल्या मनाचा ताबा घेते. भीतीच्या पोटी तर्कबुद्धीला थाराच नसतो. 

शुक्रवार, ४ जुलै, २०१४

मनाशी संवाद

प्रत्येक वेळी मागे वळून पाहिल्यावर आपण किती इग्नोरंट होतो (रादर वेडे होतो) हे कळतं. म्हणजे पुढे गेल्यावर कळतं की आपण हे करायला हवं होतं किंवा नको होतं. कारण तेव्हा एक टॉप व्ह्यू आलेला असतो भूतकाळाचा. प्रत्येक पॉईन्टच्या भोवतालची सगळी परिस्थिती माहित असते.  पण वर्तमानात तसं नसतं. वर्तमान एक कोडं असतं. काही अंतरापलीकडे नजरच पोहचत नाही. भविष्यात डोकावणं फार थोड्या लोकांना जमतं. त्यामुळे नेहमी मनात एक फिलिंग असते की मी काहीतरी मिस करतोय जे वेळ निघून गेल्यावर किंवा फार उशीर झाल्यावर कळणार आहे. पण हे अपरिहार्य आहे म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे जे जे करता येईल ते करायचं आणि जे जे समोर येईल ते ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं बस. 

मंगळवार, १ जुलै, २०१४

मनात येईल ते

दिड वाजलाय रात्रीचा आणि अजून मी जागाच. पण हे रोजचंच झालंय आता जवळपास. 'वीणा इन व्हिएन्ना' ऐकतोय. सुचवण्यासाठी थ्यांक्स टू विशाल. झोपावं असं मनात आहे पण हे क्षण असेच धरून ठेवण्याचा एक प्रयत्न. रात्री नाऊनंतर टाईम एकदम accelerate होतो. हा हा म्हणता मध्यरात्र उलटून जाते. पण कानात इअरफोन्स आणि मनात विचार असले की झोप कुठून येणार? आणि त्यात भरीस भर म्हणून पाऊस पडून थंड झालेलं वातावरण. ही रात्र अशीच चालत राहिली तर कुणाचं काय बिघडतं? या क्षणी जगात काय काय घडत असेल बरं? उद्या ल्याबमध्ये भयंकर झोप येणार. 

माणूस अजब गोष्ट आहे ना? आपल्याभोवती आपल्याच विचारांचं जग निर्माण करतो आणि मग भोवतीच्या खऱ्या जगात त्याचं प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न करतो. विचारही किती! क्षणक्षणाला एकेक उगवतात. पाण्यावर उठणाऱ्या तारांगांसारखे. नुसती हालचाल चाललेली असते मनाची. झोपेत तरी कुठे शांत असतं ते? स्वप्नं पडतातच…  इच्छा असो वा नसो आणि मग त्यांत रमायला लागलं की सकाळ होते. मग स्वप्नात काय पाहिलं हेही आठवत नाही. लिहिण्यात तोचतोचपणा आल्यासारखं वाटतंय. पण करणार काय माणूस तोच आहे ना राव. संगितासारखा आनंद जगात इतर कुठे आहे? म्हणूनच तर काहीजणांना हे विश्व संगीतातून निर्माण झाल्यासारखं वाटत असावं. आपल्याला काय वाटतं हे आपल्या मूड्सवर खूपच अवलंबून असतं. या पोस्टला टायटल काय द्यावं हाही एक प्रश्नच आहे. randomला मराठीत काय म्हणतात काय माहित राव.  

सोमवार, २३ जून, २०१४

अज्ञाताच्या शोधात

इंटरनेट असलं की पाच मिनिटेसुद्धा ब्राउजरकडे फिरकल्याशिवाय जात नाहीत . दर दोन तीन मिनिटांत एकदातरी ई मेल किंवा फेसबुक किंवा उगाच नवीन tab ओपन करून काहीतरी शोधणं चाललेलं असतं. नवीन मेल आला असेल का, फेसबुकवर कुणाचे नवीन अपडेट्स आले असतील का, मीच काही अपडेट्स करू का, अशा एक ना अनेक गोष्टींसाठी आणि बहुतेक वेळा उगाच सवय म्हणून नेटवर जाणं होतं आणि भरपूर वेळ वय जातो. बऱ्याच वेळा असं होतं की काही काम नसताना उगाच आपण ब्राउजर ओपन करतो आणि मग आपण कशाच्या शोधत इकडे आलोत हेच माहिती नसतं किंबहुना आपण अज्ञाताच्या शोधात असतो असंच म्हणावं लागेल. मग ते अज्ञात काहीही असो. काहीतरी अनपेक्षित भेटेल अशी अपेक्षा असते. हे सगळं कळतं हो, पण वळत मात्र नाही. वेळ जायचा तो जातोच.

रविवार, ११ मे, २०१४

हे आपलं असंच

पुस्तक वाचण्यातली जी मजा आहे ती चित्रपट पाहण्यात नाही. पुस्तक वाचताना वाचक त्याच्या मर्जीनुसार चित्र रंगवू शकतो. पुस्तकातले सगळेच अनुभव वाचकाने घेतले असतीलच असं नाही पण तरीही आपापल्या अनुभवांशी सांगड घालण्याचा त्याचा प्रयत्न असतो. चित्रपटात मात्र ते कल्पनास्वातंत्र्य नसतं. तिथे डायरेक्टरच्या डोक्यात जे येईल ते प्रेक्षकांना पाहावं लागतं. उदाहरणादाखल व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडी मधला हा उतारा पहा 

"बघता बघता काळोख नाहीसा झाला. दिसू लागले. झाडेझुडपे, दगडगोटे यांना आकार आला. चांदण्या दिसेनाशा झाल्या. रातकिड्यांचे गाणे थांबले. झोपेतून जाग्या झालेल्या कावळ्यांची जाड कावकाव ऐकू आली. तांबडा पिवळा सूर्य माळाआडून वर आला. हिरवट प्रकाशाला पिवळी झळाळी आली. बोरींच्या झुडपात बसून राहिलेल्या सातबाया जाग्या झाल्या. शेपटी नाचवून कलकलू लागल्या. … "

बाकी शून्य-४

प्रिय,

आपल्या आयुष्यात होणाऱ्या भूकंपाने फक्त आपणच हादरून जात असतो. जगाला त्याचा मागमूसही नसतो आणि पर्वाही नसते. आणि तरीही आपण उगाच सगळ्यांना ओरडून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. माणसानं आपले अनुभव आपल्यापुरतेच ठेवावेत हेच खरं. आपल्या भाव भावनांचं उगाच प्रदर्शन न मांडलेलं बरं. आणि मुळात तशी गरज का म्हणून वाटावी? माहित आहे ना आपल्या हाकेला उत्तर नाही येणार म्हणून. मग हाक द्यायचीच कशाला? 

-बाकी शून्य 

शुक्रवार, ९ मे, २०१४

रिसर्च

जगातला ९९% रिसर्च हा फक्त डिग्री किंवा प्रमोशन मिळवण्यासाठीच केला जातो. फक्त पेपर छापायचे हा एकच हेतू असतो. बाकी तो आपण कशासाठी करतोय, त्याचा खरोखरच काही उपयोग आहे की नाही हे तपासून बघण्याची तसदी कुणीही घेत नाही. आता माझाच रिसर्च घ्या. तो कुठेच इम्प्लिमेंट होणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. अजून कशाला मी आणि माझा गाईड आणि फार तर रिव्ह्युअर यांच्याशिवाय माझा थेसिस कुणीही वाचणार नाही हेही चांगलंच माहित आहे. तरीही मी हे का करतोय?कारण तोच एक मार्ग आहे एम.एस. कम्प्लीट करण्याचा. बरं रिसर्च म्हणजे काही लई भारी वगैरे नसतं. जगातलं सगळ्यात बोरिंग काम असतं ते. कसलीच एक्साईटमेंट नसते आणि एक्साईटमेंट तर सोडाच अधून मधून डिप्रेशनचे फेजेस येत असतात. कसलीच निश्चितताही नसते. मग तरीही मी हे करतोय. ही कुणाची फसवणूक म्हणायची? स्वतःची की समाजाची? 


गुरुवार, १ मे, २०१४

असंच काहीतरी

मंडळी तुम्ही काहीही म्हणा पण एक गोष्ट खरी की आपल्याला आपली लाईफ भयंकरच बोरिंग वाटत असते. आपल्या लाईफमध्ये सालं काही happeningच नाही असं सतत वाटत असतं. तेच तेच रटाळ जगणं. कधी कधी तर कुठे तरी पळून जावसं वाटतं. याउलट आपल्याला इतरांच्या लाईफचं खूप आकर्षण असतं आणि कधी कधी हेवासुद्धा वाटतो. त्यात आपले मित्र, नातेवाईक तर असतातच पण विशेषतः चित्रपट, सिरिअल्स, कथा-कादंबऱ्या यांच्यातले कॅरॅक्टर्ससुद्धा असतात. त्यांचं लाईफ किती happening असतं ना. भलेही ते काल्पनिक असेल पण रंजक असतं. 

शनिवार, २६ एप्रिल, २०१४

बाकी शून्य -३

प्रिय, 

असं म्हणतात आपलं दुःख हे आपल्यापुरतंच ठेवावं. हेच केलंय आतापर्यंत. पण मनात एवढं दुःख, एवढ्या वेदना दाटल्यात की ते रितं केल्याशिवाय पुढे येणाऱ्या दुःखांना तोंड देता येणार नाही. मला कुणाची सहानुभूती मुळीच नकोय. फक्त ऐकून घेणारी एक व्यक्ती हवी आहे. तुला कदाचित माझ्या दुःखांची दाहकता जाणवणारही नाही. 

आपल्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला तू पहिला आहेस का? मी  पहिला आहे. एकदा नाही तर अनेकदा. किंबहुना माझी सगळी स्वप्ने प्रत्येक वेळी धुळीस मिळाली आणि त्या प्रत्येक वेळी मी मोठ्या आशेने पुन्हा उभा राहिलो. संघर्ष करायला. नव्या स्वप्नांना उराशी घेऊन पुन्हा चालत राहिलो. प्रत्येक वेळी. पण सगळं संपलंय आता. निराशेच्या भयाण गुहेत उभा आहे मी . एकटाच वाट चालत उजेडाचा माग घेत इथवर आलो आहे. आता त्राण राहिले नाहीत शरीरात आणि आशाही उरली नाही मनात. तरीही असा निराशेच्या घनघोर अंधारात कित्येक पावले चाललो. पण आता मात्र नाही चालवत. बस्स झालं हे सगळं. नियतीला जे हवंय ते होऊ दे. तिच्यावरच सोपवलंय आता प्रारब्ध. मनगटातला जोर हा असा ओसरतो हे माहित असतं तर एवढा उद्व्याप केलाच नसता. तळहातावरच्या रेषा इतक्या बलदंड असतात हे माहित असतं तर स्वतःच्या वाटा बाहेर शोधण्याऐवजी तळहातावरच्या रेषांनाच वाटा बनवून चाललो असतो. 

बाकी शून्य 

बुधवार, १६ एप्रिल, २०१४

बाकी शून्य - २

प्रिय, 

कधी कधी जेव्हा आपण अगदी निराश अगदी उदास असतो तेव्हा एखादा चित्रपट, एखादं गाणं, एखादी सुंदर आठवण, एखादा फोटो आपल्याला एकदम ताजंतवानं करून टाकतात. एखादा विचार आपल्यामध्ये उमेद निर्माण करून जातो. सगळंच बदलल्यासारखं वाटतं. ढग जाऊन अगदी स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्यावर जो आनंद होतो तसंच काहीसं वाटतं. मी आता तसंच काहीतरी अनुभवत आहे. संध्याकाळी खूप डिप्रेस व्हायला झालं होतं पण मग काही गाणी ऐकली आणि कसे कुठून अगदी सकारात्मक विचार डोक्यात उगवायला लागले कुणास ठाऊक सगळा आसमंत उत्साहाने भरून गेला. आपण आहोत, हे जग आहे ही जाणीवच एकदम एक्सायटिंग आहे, नाही का? हे असं का होतं? 

असो. अजून एक गोष्ट म्हणजे उद्या घरी जायचंय. त्याचा आनंदही आहे. प्रवासाचा आनंद आहे. मला प्रवास भयंकर आवडतो. पण उद्यापेक्षा आजचा दिवस विशेष. कारण आजच्या दिवसाला उद्या आहे ज्याच्या गर्भात आनंद दडलाय. पण उद्यासाठी उमेद कुठून आणावी? कारण परवा काय हे अनिश्चित आहे. अनिश्चिततेच्या गर्भात काय आहे कुणास ठाऊक? पण मला त्याची पर्वा नाही आता. आता मी खूष आहे. 

बाकी शून्य 

मंगळवार, १ एप्रिल, २०१४

बाकी शून्य -१

प्रिय,
खूप खूप काही सांगायचंय तुला. पण मला जे वाटतंय ते शब्दांत कितपत मांडता येईल माहित नाही. काही विचार, काही गाणी, काही सुगंध, काही आठवणी आपल्याला देहातीत घेऊन जातात असं तुला कधी वाटलंय का? मला ते आताशा वारंवारच वाटायला लागलंय. किंबहुना वर्तमानापासून दूर कुठेही जावंसं वाटतंय. कदाचित आता वर्तमानात मन रमत नाही म्हणून असेल. भविष्याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करत नाही कारण त्याची शाश्वती नाही.  काळाबरोबर माणूस किती बदलतो, नाही का? दुःख पर्वताएवढे झेलून माणूस प्रगल्भ होतो का? की अजूनच हळवा होतो? असो. जरा थकवा आला होता म्हणून हा पत्रप्रपंच. थकवा आला कि मग मनसुद्धा उदास होतं, नाही का? तसंच झालंय माझं अन त्यात ही अंधारी रात्र. काळोख दिसतोय सगळीकडेच. पण मी अजून आशा सोडली नाही हेच तुला सांगायचंय. लढण्याची उमेद अजून मनात आहे. शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करायची माझी तयारी आहे. त्या सूर्योदयाच्या एका सोनेरी क्षणासाठी ही रात्रच काय अशी अंधारलेली युगेयुगे संघर्ष करायची माझी तयारी आहे. फक्त तू माझ्या पाठीशी राहा म्हणजे मला लढताना एकटं वाटणार नाही. 

बाकी शून्य 

सोमवार, ३ मार्च, २०१४

एक सकाळ अशी

सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास मला जाग आली तेव्हा ट्राव्हाल्स बँगलोरपासून सुमारे सत्तर किलोमीटरच्या आसपास  होती. हैदराबाद बँगलोर असा प्रवास पहिल्यांदाच करत होतो आणि तेही ट्राव्हाल्सने. शेजारच्या सीटवर कुणीच नव्हतं. म्हणून मस्त ऐसपैस मांडी घालून हवं त्या पोजमध्ये झोपलो. पण रात्रभर थंड वाऱ्याने झोप काही लागू दिली नाही आणि त्यात माझी विंडो सीट आणि खिडकी पूर्ण बंद होईल तर शपथ. कुठल्यातरी फटीतून गार हवा येत होती आणि ती कुठून येत होती हे मात्र उलगडत नव्हतं. पहाटे पहाटे जरा डोळा लागला होता.  पण  कुणा एका गाढवाने खिडकी उघडली आणि परत थंड वाऱ्याचा फटकारा.  (ही असली गाढवं जगात भरपूर संख्येने आढळतात.) मग उठावं  लागलं. असंही सकाळ झाली होती. उठल्यावर बाहेर पाहतोय तर आभाळ भरून आलेलं, रात्री चांगलाच शिडकावा झालेला दिसत होता. गाडी सुसाट वेगाने धावत होती आणि आता वाराही मस्त वाटत होता. बाहेर नुसते दगडच दगड दिसत होते. लाल माती आणि छोटे मोठे दगड. अधून मधून हे भले मोठे अजस्त्र दगडी डोंगर. एक गाव तर डोंगराच्या कुशीत वसलेला अन वर टेकडीवर भले मोठे दगड. एवढे कि त्यांच्यापैकी एक जरी दगड घरंगळत खाली आला म्हणजे गाव जमीनदोस्तच. अधून मधून पावसाच्या सरी यायच्या. डोंगरांना बिलगून असलेले ढग नजरेस पडायचे. डोंगरांची टोकं ढगांच्या आड गायब झालेली असायची. मग थोड्याच वेळात ट्राफिक वाढायला लागली. गाडी बँगलोरमध्ये आली होती.  

रविवार, २ मार्च, २०१४

हल्ली कुणालाही फोन केला किंवा कुणाचाही फोन आला कि एकच प्रश्न : मग कुठपर्यंत आलं MS? कधी संपणार? यात त्यांचा हेतू चांगलाच असतो. पण खरं तर या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडेच नाहीत. काय उत्तर देणार मी? बरं ते माझ्या हातात असतं तर सांगितलंही असतं की अमुक अमुक दिवशी होईल. इथे मलाच माहित नाही माझं MS कुठपर्यंत आलंय आणि कधी पूर्ण होणार ते.  हा प्रश्न ऐकून मला जबर टेन्शन येतं. म्हणजे कुणीतरी मानगुटीवर बसून विचारत असल्यासारखं वाटतं. मागे एवढे दिवे लावलेत त्यामुळे आधीच अपराधी वाटतंय आणि त्यात हे असले अवघड प्रश्न…! 

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

आयुष्य हे...

मुळात आशावादी असणं हा माणसाचा स्वभाव आहे. कितीही मोठं अपयश आलं तरीही शेवटी त्याला पुरून उरण्याची आशा आपल्या मनात कुठेतरी खोल रुजलेली असते. अपयशाने काही काळ आपण खचून जातो हे नक्की पण मग जेव्हा नॉर्मल होतो तेव्हा मनातल्या आशेला धुमारे फुटू लागतात आणि ते आपल्याला उठून उभं राहण्याची, लढण्याची, स्वप्नं बघण्याची नवी उमेद देतात. मी तर म्हणतो माणसानं नेहमी स्वप्नं पहावीत. मोठी मोठी. भलेही ती पूर्ण होवोत अगर न होवोत. त्या स्वप्नांच्या शोधात जगावं. यशापयशाची चिंता न करता मनमुरादपणे झोकून द्यावं स्वतःला. आयुष्याला आव्हान द्यावं. पण त्याचबरोबर जे समोर येईल त्याला तोंड देण्याची तयारीही असावी. शेवटी काय तर मनासारखं जगण्याचं समाधान हवं. कुणी काहीही म्हणो आपण केलं ना आपल्याला हवं ते, मग झालं. मग आपल्याला काय मिळालं, आपण काय गमावलं हे सगळं गौण. मुळात स्वप्नं पूर्ण करण्यापेक्षाही त्यांच्या पूर्ततेसाठी झगडणं हेच तर आयुष्य.