पृष्ठे

रविवार, २७ मे, २०१२

नसती उठाठेव


कधी कधी खूप कंटाळा येतो- जगण्याचा, अस्तित्वाचा. आपलं अस्तित्वच एक ओझं वाटायला लागतं. खूप थकल्यासारखं वाटतं. ही नसती उठाठेव कशासाठी चाललीय, इतकं अवघड आहे जगणं, मनासारखं कधीतरी जगता येईल कि नाही असं  वाटतं. जगणं  -अगदी साधी आणि सरळ गोष्ट. पण आपला हव्यास (ज्याला आपण महत्त्वाकांक्षा असं गोन्डस नाव देतो), आपले egos आपलं जगणं अगदी complex करून टाकतात. किंबहुना ते जगणं उरतच नाही, practical असण्याच्या नावाखाली ती तडजोड असते आनंदाशी, आनंदी असण्याशी आणि ती कशासाठी तर आनंदासाठीच. हे म्हणजे मृगजळासारखं आहे. आपण त्याच्या जवळ जाईपर्यंत ते अजूनच पुढे गेलेलं  असतं. आणि ते मिळवण्यातच आनंद आहे असा आपला ग्रह आपण करून घेतलेला असतो. आणि मग काय त्याच्यामागे धावण्याशिवाय पर्याय उरत नाही. खरा आनंद कशात आहे हे आपण विसरूनच जातो. मला आठवतं लहानपणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद असायचा. पण जसजसा मोठा होत गेलो तसतसा छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंदही कमी होत गेला आणि आनंदाची व्याख्याच आता बदललीय. असं करून आपण आपल्यालाच आनंदापासून दूर नेतोय  हे कळत नाही असं नाही. पण आता आपला इगो आपल्याला परत जाऊ देत नाही. तू हे मिळवलंस आता तुला हे मिळवायचंय असं  आपण स्वतःला बजावत असतो. मला एवढ्या पगाराचा, असल्या प्रोफाईलचा जॉब  मिळवायचाय. "तुम्ही गरीब म्हणून जन्मलात यात तुमचा काही दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे"  ही असते आपली ideology.  पण "का, कशासाठी" असा साधा प्रश्नही आपण स्वतःला कधी विचारात नाही. मान्य आहे पैसा कमावलाच पाहिजे. ते आवश्यक पण आहे. पण कोणती किंमत देऊन? साध्य देऊन साधन घेतल्यासारख झालं हे , नाही का?


गुरुवार, ३ मे, २०१२

प्रतिभा.............

एक दिवस (कि रात्री) ती दिसली. माझ्याजवळ येऊन खूप सुंदर, मोहक, निरागस हसली. आणि अशी येऊन थेट माझ्या शेजारीच बसली. अगदी मला खेटून. मला म्हणाली "असा पहिल्यांदाच भेटल्यासारखा काय पाहतोस ? नेहमीच तर भेटतो आपण." कोण ही,  कुठून आली आणि अशी काय बोलते? आणि पहिल्यांदाच तर भेटत होतो आम्ही बहुधा. की नाही? आता मात्र मला तिला पूर्वी कधीतरी भेटल्यासारख वाटतंय. की ती म्हणाली म्हणून मला तसं वाटतंय. पण मग आम्ही आधी भेटलो तर मला काही आठवत का नाही? ते जाऊदे. ती अप्रतिम सुंदर  होती. माझी तांद्री  भांगीत मला म्हणाली "चल आपण अस्तित्वाच्या पार त्या टोकाला जाऊ,  देहभान विसरून. जीथं फक्त तूच असशील आणि सोबत मी.  फक्त तुझीच. आणि मग आपण या भौतिक, व्यवहारी जगाचे सर्व नियम भिरकावून काही तरी नवीन असं निर्माण करूया."  तिची असली काहीतरी बडबड चालू होती. मी आपला देहभान हरपून तिच्याकडे बघतच होतो. आता मात्र हे जरा जास्तच होत होतं. "मी  स्वप्नात तर नाही ना?" माझ्या मनात मनात  शंका आली. इतक्यात ती म्हणाली "काय फरक पडतो? स्वप्न आणि सत्य हि दोन्हीही सारखीच नाही का? स्वप्नात जे दिसतं ते तेवढ्या पुरतं सत्यच नसतं का? आणि जे जागेपणी अनुभावतोस ते तरी सत्य असतं कशावरून? तेही कधी ना कधी स्वप्नवतच होणार असतंच की. सत्य हे असं पाच  ज्ञानेन्द्रीयांच्या अनुभूतींमध्ये नाही पकडता येत. ते कधीकधी त्याच्याही आवाक्या बाहेरचं असतं.  आणि ते काळ आणि स्थळ सापेक्ष असतं." हे पचायला जरा जडच होतं. आणि मझं देहभान खरच हरपलं होतं. 

मी: हे काय असलं अतार्किक बोलतेस? आणि मला सांग तू आहेस तरी कोण? 
(हे नक्कीच स्वप्न असणार. त्याशिवाय एवढी सुंदर मुलगी मला स्वतःहून 'मी फक्त तुझीच' असं म्हणणारच नाही. )

ती: मी कोण ते तुला कळेलच वेळ आल्यावर. आणि आता तू मला सांग तर्क काय असतो? अनुभवांची गोळाबेरीजच ना. मग तर्क तरी अनुभवाच्या कुंपणाबाहेर कसा जाईल? हेच तर सांगायचंय मला तुला. तर्काच्या आणि मुळातच अनुभवाच्या बंधनाच्या बाहेर ये. मनाला मुक्त कर. त्याला मुक्तपणे संचार करू दे या अमर्याद विश्वाखिलात आणि त्याच्याही पलीकडे. हे जाणून घे कि तर्क, कारण, परिणाम वगैरेंच्याही पलीकडे आहे मन. त्याला या भौतिकाच्या बंधनात असा जखडू नकोस. 

जशी ती दिसायला सुंदर होती तशी तिच्या बुद्धीची झेपही विलक्षण होती. पण मला काही काळात नव्हतं. बाकी काहीही असो मला ती आवडायला लागली होती हे मात्र नक्की. म्हणजे मी अगदी तिच्या प्रेमातच पडलो होतो म्हटलं तरी चालेल. Love at First Sight. 

ती: कसला विचार चालू आहे महाशय? प्रेमात वगैरे पडलास कि काय माझ्या?

मी: (मनात) ही पक्की मनकवडी सुद्धा आहे तर. आता तर हिच्यासमोर विचार करायची पण चोरीच आहे. काय करवं?

ती: काहीही नको फक्त एकच कर. तुझा so called common sense आहे ना तो जरा बाजूला ठेव आणि त्या अमर्याद आकाशाच्याही पलीकडे जाऊन पहा हे सगळ जगच वाट पाहतंय तुझी. हे तारे-ग्रह, ही सजीव आणि निर्जीव सृष्टी, सगळ चाराचारच. 

मी: ए बरं ते जाऊ दे तुझं नाव काय आहे? 

ती: का? लग्न करणार माझ्याशी?

मी: हो करीन की. तुझी हरकत नसेल तर. 

ती: माझ्या हरकतीचा प्रश्न येतोच कुठे. मी प्रतिभा. तुझीच. आणि हे लग्न वगैरे असल्या  कुबड्यांची गरज नाही आपल्या सोबतीला. मी कायमचीच तुझी आहे. अगदी कल्पांतापर्यंत. 

wow!!! हे मात्र अगदीच मस्त होतं. एकदम अनपेक्षित. एवढी सुंदर मुलगी. नावही किती सुंदर- 'प्रतिभा'. आणि मला म्हणते 'मी तुझीच'. आता मात्र मी बेशुद्ध पडायचा तेवढा बाकी होतो. 

ती: एवढा हरखून जाऊ नकोस. खरच मी तुझी आहे. 

मी: चल, काहीतरी सांगू नकोस. मग इतके दिवस आपण कसे नाही भेटलो? आणि तू कुठे होतीस? आणि आत्ताच का भेटतोय आपण? 

ती: इतके दिवस तुला माझी आणि तुझी तरी ओळख कुठे होती? अजूनही ती झालीय कि नाही शंका आहे पण तू तुला आणि मला थोडसं का होईना ओळखायला लागला आहे असं  म्हणता येईल. आणि इतक्या दिवसांचं  काय घेऊन बसलास? तू आता कुठे आहेस हे  तरी सांगू शकशील का? 

आणि काय आश्चर्य..... मी कुठे होतो याचा काहीच थांग पत्ता लागत नव्हता. जागा कि झोपेत कि अजून  कुठल्या दुसऱ्याच अवस्थेत? जिवंत कि मृत? काहीच काळात नव्हतं. आजूबाजूला नुसता अंधारच अंधार दाटलेला. मला दिसत होती ती तीच फक्त. प्रतिभा. स्वयंप्रकाशित अशी. सगळा  प्रकाश तो तिच्याच पासून होता. त्यात मी कुठेच नव्हतो. मी फक्त ऐकत होतो, पाहत होतो आणि बोलत होतो किंवा कदाचित बोलतही नव्हतो कारण तिला बोलायची गरजच नव्हती. मी फक्त विचार करत होतो आणि ती जाणून घ्यायची. मला फक्त आपण आहोत एवढी जाणीवच तेवढी होती. बाकी शरीर कुठे होतं कोण जाणे? पण हृदयाची स्पंदनं  आणि श्वासोच्छावास पण जाणवत होते. म्हणजे तिथे फक्त जाणणारा मी होतो पण जाणवणारा मी डोळ्यांना दिसतच नव्हतो. म्हणजे फसगत नेमकी कशाची होत होती डोळ्यांचीच कि सगळ्याच इंद्रियांची ते काही काळात नव्हतं. 


तेव्हा मी जागृती, सुषुप्ती, निद्रा कि समाधी यापैकी कोणत्या अवस्थेत होतो हे मला अजून कळलेलं नाही. ती नेमकी कोण होती याचाही मी अजून विचार करतोय.......