पृष्ठे

शनिवार, २२ जून, २०१३

शितू! ए शितू ग!

आज 'शितू' वाचून कम्प्लीट झाली. वाचताना 'काकस्पर्श'मधली दृष्यं डोळ्यासमोर यायची. दोन्ही कथा खूप भिन्न असल्या तरी पार्श्वभूमी सेम आहे. म्हणजे कोकण, बाल विधवा वगैरे. वाचत असताना एवढा  involve झालो होतो कि कित्येक वेळा डोळ्यात अश्रू तरळायचे आणि मग थोडा वेळ वाचणं थांबवावं लागायचं. राव आता आपला मूड भयंकर सेंटी झालाय. त्यामुळे आपल्या प्लेलिस्ट मध्ये आज फक्त रडगाणेच वाजताहेत. मनातसुद्धा काही ओल्याचिंब, सेंटी सेंटी आठवणी प्ले होतायत(हे म्हणजे लय भारी, नाही का?) 

शितू, काहीच दोष नसता जगाचे टोमणे खात राहिली, केवळ विसुसाठी अन अप्पांसाठी. शेवटी सुख म्हणून तिच्या नशिबी असं नव्हतंच. विसूला, तिच्या त्या देवाला, पापकर्मापासून रोकण्यासाठी म्हणून ती दर्यात उतरली ती कायमचीच. सुटली बिचारी जगण्याच्या कचाट्यातून. 


'शितू' तर ओहोटीच्या दर्याने आपल्या पोटी घेतली पण 'विसू' बिचारा धड जगातही नाही अन धड मरतही नाही. त्याचं शरीर आणि मन यांच्यात मरणासाठी द्वंद्व चाललेलं. कधी शरीर मरायला तयार होतं तर मन काच खातं. कधी मन निग्रह करून मरणसिद्ध होतं तर शरीराला जगावंसं वाटतं.  शितूचा निःश्वास त्या दर्याकिनारी हवेत कुठेतरी घुटमळत असेल या वेड्या आशेवर तो जगतोय. 'शितू! ए शितू ग!' असं ओरडत हिंडतोय.  

शुक्रवार, २१ जून, २०१३

शितू



आज गो. नी. दांडेकरांची 'शितू' वाचायला घेतली. अगदी नवी कोरी, नाजूक. आणि उघडल्या उघडल्या वाचली ती 'पाठवणी' नावाची तिची प्रस्तावना. शितूला गोनीदा त्यांची मानस कन्या मानतात. त्यातलं शेवटचं वाक्य मनाला स्पर्शून जातं. ते असं आहे 

रसिकवृंद! एकच प्रार्थना!
'चित्ता अति हळुवारपणा आणौनिया' शितू वाचावी! ती माझी अत्यंत लाडकी, पण जन्मभर अतिशय सोसावे लागलेली मानसकन्या आहे !

आहे कि नाही अगदी हृदयस्पर्शी? गोनीदांच्या कादंबऱ्या म्हणजे भावनांचं अजब रसायन असतं, भावकल्लोळ असतो. 'मृण्मयी'सुद्धा तशीच.  वाचताना अंतरंग ढवळून निघतात. आणि कोकणची पार्श्वभूमी, निसर्गाने मुक्त हस्ते केलेली रंगांची उधळण यांचं वर्णन हे अजून एक वैशिष्ट्य. आठवीत असताना मराठीमध्ये 'शितू' नावाचा एक धडा होता तो याच कादंबरीतला. तेव्हा साहित्यातला ओ कि ठो कळत नव्हता. आत्ताही फार कळतं अशातला भाग नाही, पण आता साहित्य वाचण्याएवढी संवेदनशीलता आली आहे एवढंच. अजून काय लिहिणार? 'पाठवणी' वाचून शितूबद्दलच्या अपेक्षा फार उंचावल्या आहेत. आणि मी आत्ताच ती वाचायला लागणार आहे. 

सोमवार, १७ जून, २०१३

कन्सर्न

परभणीसारख्या छोट्या रेल्वे स्टेशनवर  सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची, विशेषतः अप-डाऊनवाल्यांची, प्रचंड गर्दी असते. आणि त्यातले ९० टक्के लोक रूळ ओलांडण्यासाठी दादऱ्याचा वापर करण्याची तसदी घेत नाहीत. प्लाटफॉर्म वरून उडी मारून रूळ ओलांडायचा जन्मसिद्ध हक्कच. आणि यातले बरेच लोक ऐन गाडी सुटायच्या वेळी प्रकट होतात. मग चालत्या रेल्वेत चढायची धावपळ सुरु होते.कुणी वेगात असलेल्या रेल्वेत शिरतात, कुणी शिरू पाहतात,  कुणी प्लाटफॉर्म एकवर उभ्या असलेल्या गाडीतून पलीकडे प्लाटफॉर्म दोनवरच्या गाडीत जाऊ पाहतात आणि दोन्ही गाड्या चालू होतात. ही असली स्टंटबाजी पाहून इकडे प्लाटफॉर्मवर मी श्वास रोखून त्यांच्या सुरक्षेची चिंता वाहत असतो आणि माझ्याच हृदयाचा ठेका चुकतो. पण मनोमन या असल्या स्टंटबाजांचा खूप रागही येतो. उगाच जीव टांगणीला लावतात माणसाचा. त्यापेक्षा जरा लवकर आलं तर काय बिघडतं? खरं तर मला चिंता करायची मुळीच गरज नाही पण तरीही कन्सर्न हा मानवाचा स्वभाव विशेष आहे, नाही का? 

शुक्रवार, १४ जून, २०१३

...पण टाईम नाही ना राव.

आजकाल ना वेळच पुरत नाही राव. संध्याकाळी पाच सहा वाजता labमधून आलं कि एक-दीड तास बॅडमिंटन, मग मेसवर जाऊन जेवण, मग सायकलवर जी. सी. पर्यंत फेरफटका आणि नाऊ वाजतात. मग जरा वेळ काही वाचलं किंवा फोनवर घरी बोललं  किंवा एखाद दुसरं गाणं ऐकलं कि दहा. आणि मनाचा काउंटडाऊन सुरु होतो. आता झोपायला हवं असं म्हणत म्हणत टाईम पास होतच असतो. आणि शिवाय दहा वाजता जरी आडवा झालो तरी एक दोन वाजेपर्यंत उगाच पडून राहावं लागतं. झोपच येत नाही ना. मग मनाची मुक्त भटकंती चालते.  कधी स्वप्नं, कधी plans, कधी कल्पनाविलास. मग दोन तीनच्या सुमारास नकळत स्वारी निद्राधीन होऊन जाते.  आणि नेहमीप्रमाणेच सकाळी उठायला साडेआठ नाऊ वाजतात. मग ब्रेकफास्ट मिस होतो. अंघोळ वगैरे करून झालं कि डिपार्टमेंट, मग कँटीनमध्ये चहा बिस्कीट खाऊन lab. मग एखादा रिसर्च पेपर काढून वाचत बसणं त्यातही दहा वेळा gmail  आणि facebook चेक करणं, मग एखादा कन्सेप्ट नाही समजला कि त्याचे बेसिक्स वाचणं असं करत करत साडेबारा वाजतात मग जेवायला जायचं असतं. एक दीड वाजता जेऊन आल्यावर परत तोच पेपर. आता त्यातली अक्षरे धुसर दिसायला लागतात. दोन दोन आकृत्या दिसायला लागतात. निद्रा आणि जागृती असं तळ्यात मळ्यात स्विचिंग चालू होतं. हा स्विचिंग फेज एक दीड तासांचा असतो किंवा कधी कधी दोन तासांचासुद्धा. यामधून बाहेर पडण्यार्थ अजून एक कँटीन दौरा निघतो.  दांडी यात्रेसारखे बरेच जन तिथे येउन मिळतात. मग जगाच्या पाठीवरचे गंभिरेश्ट विषय घेऊन त्यावर खल होतो. आपलं मत मांडण्यार्थ एकेक जण पुढे सरसावतात. आता रिसर्च स्कॉलर म्हटल्यावर सर्वांचाच सर्वच विषयांचा सखोल अभ्यास असणार हे वेगळं सांगायला हवं का?(:p).   एव्हाना साडेतीन चार वाजलेले असतात. मग स्वारी परत labमध्ये.  जरासं वाचणं होतं. सकाळी डोक्यात उगवलेल्या  आयडियाज आता असंबद्ध वाटायला लागतात. मग थोडंसं मंथन केलं कि काही नवीन आयडीयाज उगवतात. पण दिवसभर कसली कसली गणिती भुतं पाहून प्रोसेसर आता जाम गरम झालेला असतो. अधून मधून हँग व्हायला लागतो. मग बाकी सगळं उद्यावर सोडून स्वारी labच्या बाहेर पडते… आणि एक सर्किट कम्प्लीट होतं. हे सर्किट ब्रेक करायचं स्वारीच्या मनी आहे. पण टाईम नाही ना राव.

गुरुवार, १३ जून, २०१३

शब्दांचा ढीग


कधीकधी आपण गणपती करायला जातो पण त्याचा मारुती होतो. याचं उदाहरण म्हणजे खालचा परिच्छेद. उगाच जुळवून आणलेल्या शब्दांचा ढीग. टारझनसारखं एक पारंबी सोडून दुसरीला लटकायचं असं केलंय. आणि शेवटी जिथून निघालो तिथे परत. केकुलेच्या स्वप्नातल्या सापासारखं. 

आपण आधी सुखाच्या मागे धावतो मग एकदा का ते मिळालं कि आपला भूतकाळ कुरवाळत बसतो. सुखाच्या सावलीत दुःखाच्या झळा जाणवत नाहीत. भलेही ते कितीही तीव्र असो. भूतकाळच तो. त्या दुःखाचे व्रण तेवढे मनावर राहतात. काळाबरोबर ते धुसर होत जातात. तरीही त्यांना आपण किती जपतो! मुळात सुखी राहण्याची माणसाची प्रवृत्तीच नाही का? बरं एवढ्यावर कुठे आपलं समाधान होतं? आपली दर्दभरी कहाणी कुठेतरी कथन करावी असा अट्टाहास. आपण जे भोगलंय, जे सोसलंय, ज्या धैर्यानं कठीण प्रसंगाला तोंड दिलंय त्याची स्टोरी ऐकणारं कुणीतरी हवं असतं. मग अर्थातच त्या कथेचं उदात्तीकरण आलं. इथे ऐकणाऱ्या व्यक्तीची सहमती आणि सहानुभूती अपेक्षित असते. इथेच नात्यांची गरज निर्माण होते. नातं मग ते कसलंही असो त्यात ओलावा हवा. ओलावा नसलेली नाती रुक्ष असतात. वठलेल्या झाडासारखी. ती सावलीही देत नाहीत आणि फळेही. ती असली तरी नसल्यासारखीच. त्यांचा आधार वाटण्यापेक्षा ओझंच वाटत राहतं. असली ओझी डोक्यावरून उतरवताही येत नाहीत. ती तशीच आयुष्यभर वाहावी लागतात. आयुष्यात असल्या नात्यांसारखीच कितीतरी ओझी आपण वाहत असतो. आणि आयुष्य बोजड करून  टाकतो. त्यामुळे समोर आलेलं सुखही आपल्याला नीट दिसत नाही. त्याला डावलून आपण पुढे जातो. अज्ञात सुखाच्याच मागे धावत. आपण आधी सुखाच्या मागे धावतो मग एकदा का ते मिळालं कि आपला भूतकाळ कुरवाळत बसतो… 

रविवार, ९ जून, २०१३

लहानपण

आयुष्याच्या एका टप्प्यावर लहानपण हरवलं आणि आता किती किती दूर आलो त्यापासून. इथून ते नीट दिसतसुद्धा नाही. धुसरलेल्या काही आठवणी तेवढ्याच तरळत राहतात. दुःख ते लहानपण हरवल्याचं नाही कारण एका मुक्कामावर ते हरवणारच होतं. दुःख आहे ते त्याबरोबर बरंच काही गमावल्याचं. ती निरागसता, तो जगण्यातला मनमुरादपणा आणि बरंच काही हरवत गेलं. अजून किती आठवणी म्हणून आहेत श्वासांत, गंधांत,स्पर्शात,  हृदयात, डोळ्यांत साठून राहिलेल्या.  पण फक्त आठवणीच तेवढ्या.  त्यांच्यापर्यंत आता पोहचता येत नाही. त्या शब्दांच्या आवाक्यातसुद्धा येत नाहीत. 




गुरुवार, ६ जून, २०१३

आनंद

जीवनात आपण नेहमी कशाच्या तरी शोधत असतो, पण ते नेमकं काय असतं हे आपल्यालाही ठाऊक नसतं. खरं तर अगदी सगळीकडे,  म्हणजे चित्रपट, गाणी, कविता, साहित्य, नाती-गोती, सखे-सोबती वगैरे सगळ्यांमध्येच आपण आनंद शोधत असतो. यांपैकी काही ठिकाणी तो मिळतोसुद्धा.  मुळात आनंद आपल्यातच असतो. पण बऱ्याच वेळा बाहेर शोधूनही कुठे न सापडल्याने आपण निराश होतो. आपल्याला एकदम मोठं काहीतरी मिळवायचं असतं, मोठ्या आनंदासाठी. आणि त्या मोठ्या आनंदाच्या शोधत कुठेतरी आपण छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो. आणि मृगजळाप्रमाणे तो मोठा मासा काही आपल्या गळाला लागत नाही.