पृष्ठे

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

आयुष्य

आयुष्याच्या एका टप्प्यावर जाणवतं की आयुष्य म्हणजे काही स्पर्धा (रेस) नव्हे. आयुष्य म्हणजे प्रवास. कुणी आपल्यापुढे तर कुणी आपल्यामागे असणारच. सगळेच आपापला मार्ग क्रमित आहेत. थोड्याफार फरकाने सगळेच संघर्ष करत आहेत. उगाच आपला मोठेपणा, इगो, सुख-दुःख यांचं प्रदर्शन करण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाचंच आयुष्य एकेक महाकाव्य आहे आणि प्रत्येकच जण आपापल्या कथेचा नायक/नायिका आहे. 

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

तुकाराम

तुकाराम मुंडेंना लोकांनी चक्क तुकाराम महाराज करून टाकलं आणि तेही असे तुकाराम महाराज जे लोकांना हवे आहेत. तुकाराम महाराज काय किंवा तुकाराम मुंडे काय दोघेही शेवटी माणसेच. त्यांना माणसेच राहू द्या. लार्जर दॅन लाईफ काहीही आणि कुणीही नसतं. किंबहुना लार्जर दॅन लाईफ असं कुणी असावं ही आपण सगळ्यांच्या मनातली भावना असते. सांख्यिकीच्या भाषेत सांगायचं झालं तर बहुतेकजण मध्याच्याच अवती भवती कुठेतरी  असतात आणि मग कधीतरी कुणी एखादा तुकाराम होतो मध्यापासून थोडा दूर जाऊ पाहणारा. आपण त्यांना लार्जर दॅन लाईफ ठरवून मोकळे होतो आणि आपली आपल्याच कर्तव्यापासून सुटका करून घेतो. आपण आपली नैतिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या अशा आऊटसोर्स करू पाहत असतो. 

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

राम

'राम मंदिराच्या बाबतीत तुझी भूमिका काय आहे ?'

'माझ्या भूमिकेचा संबंध काय? एक हिंदू म्हणून माझी भूमिका मंदिर व्हावे हीच असायला हवी आणि आहे . मला अधून मधून स्युडो सेक्युलॅरिझमचे उमाळे नाही येत. राम  मंदिराबाबत भूमिका विचारणे म्हणजे मूर्खपणा होय. सत्य काय आहे? त्या जागी आधी मंदिर होते हे सिद्ध झालंय त्यामुळे माझ्याच काय कुणाच्याही भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे? आणि माझी भूमिका विचारण्यामागचा हेतू मला उजवा, डावा, कट्टर, धर्मांध, सेकुलर, आमच्या बाजूचा,  त्यांच्या बाजूचा आदींपैकी एक लेबल लावणे हाच असू शकतो.

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

आंतरजातीय विवाह

लग्न हे केवळ दोन व्यक्तिंमधलं नातं नसून दोन कुटुंबांमधलं नातं असतं. आणि जेव्हा दोन कुटुंबे नातं जोडतात तेव्हा अर्थातच कॉम्पॅटिबिलिटीचा विचार होणारच. आताशा कुठे लोकांची वागणूक, राहणीमान, खानपान हे जातींच्या पलीकडे जाऊन त्यामध्ये थोडीफार समानता येत आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाहासाठी आपला समाज परिपक्व व्हायला बराच अवधी जावा लागेल असं मला तरी वाटतं. कुठलाही बदल एकदम घडण्यापेक्षा हळूहळू झाला तर दीर्घ काळ टिकतो. त्यामुळे आंतरजातीय विवाहांची प्रक्रिया ही क्रांतीपेक्षा उत्क्रांती म्हणून घडली तरच त्यातून चांगलं काही निष्पन्न होईल.

गुरुवार, २३ जुलै, २०२०

लॉकडाउन

एका बाजूला सांगत आहेत लॉकडाउन मेडिकल सुविधा वाढवण्यासाठी होतं. किती सुविधा वाढल्या? बरं इतके दिवस लॉकडाउन करूनही बऱ्याच ठिकाणी रुग्णांना बेड्स नाहीत म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जावं लागत आहे आणि तिथल्या बिलांच्या कथा तर आपल्या कानी पडत आहेतच त्याबद्दल वेगळं सांगायला नको. दुसऱ्या बाजूला  केसेस वाढल्या म्हणून काही ठिकाणी सात, काही ठिकाणी तर अगदी दोन दिवस, तीन दिवस लॉकडाउन असाही पोरखेळ चालू आहे. दोन, तीन, सात दिवसांचा काय यांनी कोरोनाव्हायरससोबत करार केलाय का? कुठलं तर्कशास्त्र आहे यामागे? दिल्लीपासून गल्लीपर्यंत कुठेच नियोजन नाही, दूरदृष्टी नाही, सुसूत्रता नाही, संवेदनशीलता नाही. एका बाजूला कोरोनाचं अस्मानी संकट, दुसऱ्या बाजूला दूरदृष्टीच्या, नियोजनाच्या अभावामुळे, शासन-प्रशासनात बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे उभं राहिलेलं सुलतानी संकट यांच्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातोय. ही सगळी व्यवस्था ज्याच्यासाठी उभी आहे त्याचाच बळी याच व्यवस्थेकडून घेतला जातोय अगदी रोजच्या रोज. कोरोना व्हायरसच्या निमित्ताने आपली प्रशासन व्यवस्था किती कुचकामी आहे हे अधोरेखित झालंय आणि होतंय. 

रविवार, १९ जुलै, २०२०

कोरोना - हे पाप कुणाच्या माथी मारायचं ?

कोरोनाचा प्रसार रोखण्यात आपल्याला सपशेल अपयश आलेलं आहे हे उघड सत्य आहे. आणि या अपयशात आपल्या सर्वांचाच (शासन, प्रशासन, जनता) वाटा आहे.  बहुतेक   वेळा "शासन तरी काय करणार?", "प्रशासन तरी काय करणार?", "अमेरिकेसारख्या देशाने हात टेकले तिथे आपली काय गत", "लोक ऐकतच नाहीत , उगाच बाहेर फिरतात" अशा कमेंट ऐकायला मिळतात. शासन, प्रशासन नाही तर मग कोण सोडवणार हा प्रश्न?   शासन आणि प्रशासन काय  फक्त लाल दिव्याच्या गाड्या घेऊन मिरवायला आहेत का ? अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देश म्हणजे कुठले मापदंड आहेत का?  आणि लोकांचीही काही प्रमाणात चूक आहे हे मान्य पण लोक काही कारणासाठीच बाहेर पडत असतात. प्रत्येक ठिकाणी ओरड होते "लोक विनाकारण गर्दी करतात". पण आज बाहेर पडणारे आणि उद्या बाहेर पडणारे लोक वेगळे असू शकतात ना. लोकसंख्या विचारात घेऊन लॉकडाउन प्लॅन केलंय का? छोट्या-मोठ्या शहरांना, खेड्या पाड्यांना सरसकट एकाच नियमात कसं बसवता येईल? बऱ्याच ठिकाणी अंमलात आणला जात असलेला दिवसातून ठराविकच वेळेसाठी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय अत्यंत मूर्खपणाचा वाटतो. त्या ठराविक वेळेत कोरोनाचा प्रसार होणार नाही याची शाश्वती कुणी दिली तुम्हांला? उलट यामुळे लोक पॅनिक होऊन गर्दी करू शकतात आणि तेच होतंय. जिल्हा, तालुका पातळीवर किती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले आहेत? किती अधिकाऱ्यांनी काय करता येईल याबाबत निवडक लोकांसोबत चर्चा केली आहे? प्रशासनाला दिलेले अधिकार जनतेची अडवणूक करण्यासाठी नव्हेत. प्रश्न सोडवायचा म्हटलं की मार्ग निघत जातात. पण इथे शासन आणि प्रशासनाच्या स्तरावर उदासीनता दिसते आणि उलट प्रश्न चिघळत ठेवण्यातच रस असल्याचं दिसतंय. 

शनिवार, ६ जून, २०२०

परीक्षा

परीक्षा हव्यात की नको या वादाला राजकीय वळण लागलेलं आहे. यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचं काय मत आहे हे जाणून घेतलं पाहिजे. जेएनयू, आयआयटी आदींसारख्या देशातील अग्रगण्य स्वायत्त संस्था/विद्यापीठे याबाबतीत कोणता मार्ग अवलंबीत आहेत हेही एकदा पाहिलं पाहिजे. विशेष म्हणजे स्टेकहोल्डर्स - शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना अंधारात ठेऊन नंतर अचानक सरप्राईझ देण्यापेक्षा  (जी नेहमीची सरकारी कार्यपध्दती आहे) विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात यावेत. केवळ आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित असलेल्यांच्या भरवशावर निर्णय घेण्यात येऊ नयेत. 

गुरुवार, ४ जून, २०२०

From time to time it has been the pandemics that wiped out considerably large chunks of human population, yet history is full of stories of socio-political rivelries and who's who kinda stuff. I don't remember studying history of any pandemic and humanity's response to it. Now, I think, is a time to reconsider what history should be taught to coming generations. 

गुरुवार, २८ मे, २०२०

खुर्ची

खुर्ची म्हणजे  काही निमंत्रण देऊन मिळालेला उपहार नसतो. खुर्चीबरोबर जसे अधिकार येतात तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त कर्तव्येही येतात. खरं तर त्या कर्तव्यांच्या पूर्तीसाठीच खुर्चीला अधिकार बहाल केले जातात. ही कर्तव्ये करीत असताना चहूबाजूंनी टीका होणे अगदी साहजिकच आहे. प्रस्थापिताविरोधी जनतेचा सूरही स्वाभाविकच आहे. जे सत्ता उपभोगतात त्यांनी टीकेला तोंड द्यायची तयारी ठेवावी आणि आपल्या कामातूनच टीकाकारांना उत्तर द्यावे. 

गुरुवार, २१ मे, २०२०

लॉकडाउन की मुस्कटदाबी

कुणी काहीही म्हणा या महामारीच्या निमित्ताने सरकारने लोकांच्या अधिकारांवर आणि  एकूणच स्वातंत्र्यावर प्रचंड मर्यादा आणल्या आहेत आणि आता असं मर्यादित जगणं हाच नॉर्म होईल की काय ही भीती आहे. हे सगळं लोकांच्या आरोग्यासाठीच आहे असा युक्तिवाद होऊ शकतोही पण हे कुठपर्यंत आणि कधीपर्यंत हा प्रश्न शेवटी उरतोच. लॉकडाउनचं जितकं कौतुक व्हायचं तितकं झालं. इतर देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती चांगली आहे म्हणता म्हणता कोरोनाच्या केसेस लाखावर गेल्या.  अर्थव्यवस्थेचे बारा वाजले, लोकांची गैरसोय (खरं तर गैरसोय म्हणणं अंडरस्टेटमेंट असेल, मुस्कटदाबीच म्हणावी लागेल) झाली, देशाचं, समाजाचं वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालं, कित्येकांचं वैयक्तिक नुकसान झालं, होत आहे ते वेगळेच. म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी वेळ आलेली आहे. 

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

कोव्हीड-१९ नंतरचं जग

कोव्हीड-१९ च्या प्रसाराने सगळ्या जगाला स्तब्ध केले आहे. जीवित हानी तर झालीच पण भरून येण्यास कित्येक वर्षे लागतील असे आर्थिक नुकसानही झाले आहे आणि अजून होत आहे.  पण यानिमित्ताने आपणाला कित्येक धडेही मिळाले ज्यांच्यावर आपल्या देशाची आणि इतरही देशांची पुढची वाटचाल अवलंबून असणार आहे. आपल्या प्रायॉरिटीज पुन्हा डिफाइन करण्याची वेळ आली आहे. उदाहरणार्थ, व्यक्तिस्वातंत्र्याचा बालेकिल्ला असलेल्या युरोपमध्ये आज व्यक्तिस्वातंत्र्य धाब्यावर बसवण्याची वेळ आलेली आहे आणि  तिथे कलेक्टिव्ह वेल्फेअरला जास्त महत्त्वं प्राप्त झालेलं आपण पाहत आहोत. मुद्दा केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचाच आहे असं नाही किंवा व्यक्तिस्वातंत्र्य वाईट आहे असंही नाही तर मागची काही वर्षे विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जी मूल्ये, जी तत्त्वे कित्येक देशांनी आपापल्या समाजात रुजवली होती जी वर्ल्ड ऑर्डर प्रस्थापित झाली होती त्याचा पायाच मुळापासून हादरून गेला आहे. ग्लोबलायझेशन जितकं गोंडस आणि आकर्षक दिसतं तितकंच ते भयावहसुद्धा आहे याची जाणीव झाली आहे. कोणत्याही देशाने आरोग्य, संरक्षण, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान अशा बाबतीत स्वयंपूर्ण होणं किती आवश्यक आहे हेही अधोरेखित झालं आहे आणि होत आहे.  एक माणूस म्हणूनच नव्हे तर एक समाज आणि एक देश म्हणून सवर्वांवरच आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. 

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

आकडे

आपण, तथाकथित सुशिक्षित लोक, आकड्यांचे फार वेडे असतो, नाही का? आकडे पहिले की त्यावर विश्वास ठेवण्याकडेच आपला  कल असतो.  कुणी त्यांच्या विधानाच्या समर्थनार्थ काही आकडे आणि काही आऊट ऑफ कॉन्टेक्सट वाक्ये आपल्या तोंडावर फेकून मारली की अगदी कोणत्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवायला तयार होतो. पण आकडे हे फार फसवे असू शकतात कारण त्या आकड्यांची सत्यता कळण्याचा कुठलाच मार्ग आपल्याकडे नसतो आणि आपण तशी तसदीही घेऊ इच्छित नसतो. कुणास ठाऊक आपल्यापर्यंत आलेले मेसेजेस आणि त्यातले आकडे हे कुणाच्या तरी खोडसाळ डोक्यातच उगवलेले असू शकतात. विशेषतः सोशल मीडियाच्या काळात तर असले आकड्यांनी भरलेले मेसेजेस पसरवणे काही फार अवघड नाही आणि त्यांना मिळणार सपोर्ट पण काही कमी नाही. आपल्या सोयीचा कसलाही मेसेज लोक अगदी विचार न करता पुढे फॉरवर्ड करून देतात. या असल्या मेसेजेसचंसुद्धा  एपिडेमिक्ससारखं असतं. एकदा ते बाहेर पडले की पसरत राहतात आणि लोकांचा बुद्धिभेद करत राहतात आणि आपल्याच कोशात जगणाऱ्या बऱ्याच लोकांना आपला बुद्धिभेद झाल्याचं आयुष्यभरही समजत नाही.

सरोजकुमार भोसले  

दिवे

(चेतावणी: मी खाली जे लिहिलंय ते माझं मत आहे. इतरांची मते वेगळी असू शकतात. हे लिहावं लागतंय कारण मतभेदांना लोक खूप पर्सनली घेतात. जरा वेगळं मत व्यक्त केलं की व्यक्तिगत विरोध असल्यासारखं लोकांना वाटतं. असो)

दिवे लावायचे की नाही यावर सोशल मीडियावर बरेच वाद प्रतिवाद चालू आहेत. प्रश्न असा आहे दिवे लावल्याने कोरोनाचा नायनाट होणार आहे का? तर अजिबात नाही. याचा विज्ञानाशी काडीमात्र संबंध नाही. पण जे लोक विज्ञानवादी म्हणून दिवे लावणार नाही असं छाती ठोकून सांगत आहेत त्यांना विज्ञान कशाशी खातात हे तरी माहित आहे का? (सायंटिफिक टेम्परचा ढोल बडवणाऱ्यांना सायन्समधला ओ की ठो सुद्धा माहिती नसतो असं माझं ठाम मत आहे. ज्यांना विज्ञान माहिती आहे ते असल्या भानगडीत पडतच नाहीत. असो) दिवे लावणे हे प्रतीकात्मक (सिम्बॉलिक) आहे. त्याचा उद्देश सेलिब्रेशन नव्हे तर आपली एकात्मता दाखवणे होय, आपले मनोबल वाढवणे होय.  टाळ्या अथवा थाळ्या वाजवणे हेही प्रतिकात्मकच होते. यातून हाती काय आले हा कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकतो. त्यावर मते मतांतरे असू शकतात. ज्यांना शंका असेल त्यांनी यात सहभाग घेऊच नये मुळी. दिवे लावा आगर नका लावू नुकसान काही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दिवे लावण्यासाठी आवाहन केले म्हणजे आता फक्त दिवेच लावणे हा एककलमी कार्यक्रम आहे असं नाही. त्यामुळे दिवे लावल्याने बाकी अत्यावश्यक निर्णय सरकारने घेतलेच नाही फक्त दिवे लावण्यातच सगळं वेळ व शक्ती खर्च केली असंही काही नाही . राहता राहिला प्रयत्न सरकार काय करीत आहे याचा. तर सगळी राज्य सरकारे, केंद्र सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा आपले काम अगदी चोखपणे करीत आहे. आपल्यापेक्षा त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नक्कीच कैकपटीने जास्त आहे. निझामुद्दीनमध्ये काय घडलं ते सगळ्या जगाने, निदान भारताने तरी, पाहिलं. ती खरी समस्या आहे. त्यावर कुणी आणि विशेषतः स्वतःला सगळ्या देशाची, डॉक्टरांची, लोकांची काळजी असल्याचं भासवणऱ्या सुजनांनी भाष्य केलेलं कुठल्या ग्रुपवर दिसलं नाही. तिथे एकूणच प्रकरणाला हिंदू मुस्लिम रंग दिला गेल्याचा ढोल वाजवला जातो.  याला सिलेक्टिव्ह क्रिटिसिझम असे म्हणतात. आपल्याला हव्या त्याच गोष्टीकडे लक्ष वेधणे आणि आपल्या सोयीच्या नसलेल्या गोष्टींकडे पद्धतशीरपणे डोळेझाक करणे, तिचा उल्लेखही न करणे हा तो प्रकार होय. यातून आपलीच दुटप्पी वृत्ती दिसून येते. बाकी कुणी काय दिवे लावायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. 

-सरोजकुमार भोसले 

शनिवार, २८ मार्च, २०२०

Numbers and authenticity

We, the so called educated, are, somehow, hardwired to believe numbers. Once we see the numbers we are already biased to believe the assertion. But numbers can be deceptive because of our ignorance towards the authenticity of the source where these numbers come from. They might be a fabrication of somebody’s mind. And especially in this time of social media, it is not very difficult to make people believe anything you want by throwing out a bunch of numbers and some out of context quotes that support your assertion/s. You don’t even need to care for the spread of the message. There are plenty of people you can find who support your “cause”. This happens because we, the common people, directly get the readymade conclusions on our screens and also we don’t have enough time and resources to verify the authenticity. We have two choices: either believe it or ignore it and if "the cause" concerns us we mostly tend to believe it.  

S. B. Bhosle

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

हेच लाईफ आहे

वादळातून बाहेर आल्यावर जेव्हा तुम्हांला वाटतं की आता तुम्ही कसल्याही वादळाला तोंड देऊ शकता तेव्हा त्यापेक्षाही मोठं वादळ नियती तुमच्या समोर आणून उभी करते. एक संपला की दुसरा प्रश्न तो संपला की तिसरा अशी प्रश्नांची मालीका, ते सोडवण्यासाठी तुमचा आटापिटा, त्यातून धडपडणारे आणि घडणारे तुम्ही आणि अधूनमधून येणारे काही निवांत क्षण.  हेच लाईफ आहे. या सगळ्या संघर्षात Free Willचं काय असं बरेच जण विचारतात. पण तुमच्या आयुष्यात जे काही होतं त्यावर तुमचं नियंत्रण एका मर्यादेपलीकडे तुम्हांला हवं तितकं नसतं हेही नाकारून चालणार नाही. शेवटी आपण सारे आपल्यापेक्षाही भव्य आणि आपल्या दृष्टीने जवळपास अमर्याद अशा प्रवाहाचा भाग आहोत. त्यामुळे त्या प्रवाहाच्या दिशेने वाहणं हे अर्थातच क्रमप्राप्त आहे. बाकी आपण सगळेच प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असतोच. 




शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

राञ

दिवस म्हणजे युद्ध. रात्र म्हणजे युद्धविराम. राञ  वैऱ्याची नसते. दिवसच वैरी असतो. राञ आपली असते. सूर्याबरोबरच अस्ताला जातो तो कलकलाट - बाहेरचा आणि मानतालाही. जगाचा रहाटगाडा काही काळ स्तब्ध होतो. अंधाऱ्या रात्री कधी घराबाहेर पडून पहा. दूर आकाशात शांतपणे मार्गस्थ असलेलं चंद्रबिंब, त्याला साथ करणाऱ्या चांदण्या, शांततेत बुडून गेलेला आसमंत, शांतपणाचा उपभोग घेणारी वेडीवाकडी तरीही डौलदार झाडे, निर्जन पसरलेला रास्ता, दूर कुठेतरी अस्तित्वासाठी फडफडत असलेली ट्यूब लाईट, दुरून कुठूनतरी या शांततेचा भंग करणारा कधी कुत्र्यांचा तर  कधी किरकिऱयांचा अधूनमधून येणार आवाज हे सगळं आणि आपल्या मनातलं शमलेलं वादळ यांचं एक गूढ नातं आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला राञ आपलीशी वाटते. रात्रीचा एकेक क्षण असा हातात धरून ठेवावासा वाटतो. 

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

स्वप्नं पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. आपल्या मनात आपल्या भविष्याबद्दल एक इमेज असते जी खूप प्रॉमिसिंग आणि अपिलिंग असते. आपल्याला आपण तिथपर्यंत कसे जाऊ हे माहिती नसतं पण एक दिवस आपण तिथे पोहचू याची खात्री असते. पण जसजसा काळ जात  राहतो तसतसे आपण त्या भविष्याकडे तर सोडाच भलतीकडेच भरकटत चाललेलो असतो कारण ती इमेज आणि आपला आज यामधला जो गॅप आहे त्याचा विचारच आपण केलेला नसतो. कसेतरी म्हणजे नेमके कसे आपण तिथे पोहचणार आहोत यावर क्वचितच आपण विचार केलेला असतो.आणि मग काही काळानंतर आता स्वप्नं नुसती मनात ठेऊन नाही चालणार तर आपण त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची गरज आहे याची जाणीव होते.