पृष्ठे

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

विकांत


(विक एंड साठी "विकांत" हा शब्द मी कुठे वाचलाय हे आठवत नाही. श्रेय कुणाला द्यावं हे काळत नसल्याने 'इदं न मम' असंच म्हणतो.)
तर सांगायचं हे कि रविवारची संध्याकाळ मला मरणपंथाला टेकलेल्या माणसाच्या आयुष्यात राहिलेल्या चार क्षणांसारखी भासते. त्या वेळी मी युद्धात पराभूत झालेल्या सैन्याच्या सेनापातीसारखं फील करतो. कारण तेव्हा मी वेळ गमावलेला असतो. शुक्रवारी पुढच्या दोन दिवसांत काय काय करायचं याचे मनसुबे रचलेले असतात. आठवडाभर याच विकांताच्या जीवावर भरपूर बेत आखलेले असतात. काही वास्तव तर बरेच अवास्तव. पण यातल्या बऱ्याच (किंवा सर्वच) मनसुब्यांचा झोपेच्या किंवा आळसाच्या पायी बळी जातो. सध्याच्या संदर्भात पहायचं झालं तर कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा, आणि किती वेळ करायचा याचे बेत आखतो. हे सर्व करताना येणारे ४८ तास जणू मी तेच करणार आहे असं assumption असतं. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष मैदानात उतरून लढायची वेळ येते तेव्हा लक्षात येतं आपण सगळं ideal विचार करून आखलेलं आहे आणि इथे तर गोष्टी वेगळ्याच आहेत. मग शनिवार कसा गेला हे कळायच्या आत रविवारपण अर्ध्याच्या वर निघून जातो. आणि उरते ती रविवारची उदास उदास अशी संध्याकाळ. भयाण अशा सोमवारची पूर्वसंध्या. आणि मग खिन्न वाटायला लागतं. एक एक क्षण हातातून निसटत असताना तो धरून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालतो. पण तो क्षण जायचा तो जाणारच. मग आपण या चार क्षणांचा उपयोग करू पाहतो आणि मग आपल्या लक्षात येतं कि या दोन दिवसांत आपण बरंच काही करू शकलो असतो. असं मला आतापर्यंत बऱ्याच वेळा realize झालंय. आणि यावरून मी एक निष्कर्ष काढलाय तो असा कि हे असं काहीही नसतं.....आपल्याकडे राहिलेला वेळ जितका कमी तितका आपण त्याचा सदुपयोग करतो. परीक्षेच्या पूर्वसंध्येलाही असंच होतं. आपलं potential लक्षात येतं पण वेळ मात्र नसतो. तेव्हा बरेच नवीन शोधही लागतात.