पृष्ठे

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

एक टोक आहे ते म्हणजे मनात येईल ते करायचं , कसलाही विचार न करता बेधडक उडी मारायची, हवी ती स्वप्नं पाहायची आणि त्यांचा पाठलाग करायचा. दुसरं टोक आहे ते म्हणजे आपल्या मर्यादा ओळखून स्वप्नं पहायची, किंबहुना स्वप्नांना सुद्धा कुंपण घालून ठेवायचं, आपण काय करू शकतो आणि काय नाही ते साधा प्रयत्नसुद्धा न करताच ठरवून टाकायचं, काही गृहितकं मनात घेउनच आपली वाट चालायची. आणि आपण बहुतेक वेळा या दोन टोकांच्या मध्यावर लटकत राहतो आणि आपलं जीवनसुद्धा तसंच लटकत राहतं. स्वप्नं तर मोठी पाहतो पण त्यांचा पाठलाग करायची हिंमत आपल्यात नसते. अनोळखी प्रदेशात पाऊल ठेवायलासुद्धा घाबरतो आपण. आपल्याला थ्रिल हवं असतं पण सुरक्षेचं कवच पांघरूनच. कसलं विरोधाभासी वास्तव आहे, नाही का? 

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

युद्ध...स्वतःशी

आपल्यापैकी प्रत्येक जण रोजच युद्ध लढतो आहे… स्वतःशी, परिस्थितीशी… कधी विजय होतो तर कधी पराजय … या युद्धात नेहमीच जिंकणं अपेक्षित नाही…पण दोन्हीही स्वीकारायला शिकणं महत्त्वाचं आहे … किंबहुना जय पराजय यांच्याही पलीकडे जाऊन रणांगणात टिकून राहणं महत्त्वाचं आहे… अगदी समोर पराभव दिसत असला तरीही… आजचा पराभव विसरून उद्याच्या लढाईची तयारी करणं हाच खरा पुरुषार्थ 

रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

आपण जिथे आहोत तिथून इतरांची आयुष्यं किती सुंदर दिसतात, नाही का? दुरून डोंगर साजरेच दिसतात. जवळून पाहिल्यावरच कळतं की किती काटे कुटे आणि खाच खळगे आहेत ते. आपल्या सुखाच्या कल्पनाही कधी कधी किती उथळ असतात. खूप मोठी झेप घ्यावीशी वाटते. पण छोटी छोटी पावले टाकण्यातही आनंद असतोच की. 

शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

व्यक्ताव्यक्त

व्यक्त होणं, व्हावसं वाटणं ही माणसाची गरज आहे. आपली सुख दुःखं, आपल्या व्यथा, आपल्या चिंता, आपल्या अचिव्हमेंट्स इतरांसोबत शेअर करावसं वाटणं स्वाभाविक आहे. पण मनातलं सगळंच कुठं व्यक्त करता येतं. काही गोष्टी शब्दांअभावी मनातच राहतात तर काही शब्द गवसूनसुद्धा बाहेर पडत नाहीत. माणसानं आपलं मन रितं केलं पाहिजे असं कुणी कितीही म्हटलं तरीही ते शक्य आहे का? खरं तर व्यक्त न करता येण्यासारख्या कित्येक गोष्टींनी मन भरून गेलेलं असतं. आणि ते रितं करू म्हटल्याने काही रितं होत नाही. मुख्य म्हणजे कुणाकडे व्यक्त व्हायचं ? हे जग, आपल्या अवती भवतीची माणसं किती उथळ आहेत हे पाहिल्यावर तर मनातल्या गोष्टी मनातच राहिलेल्या बऱ्या असं वाटतं. इतरांनी आपल्याला समजून घेतल्यवर मिळणाऱ्या सुखापेक्षा त्यांनी गैरसमज करून घेतल्यावर वाटणारं दुःख भयंकर असतं.