एक टोक आहे ते म्हणजे मनात येईल ते करायचं , कसलाही विचार न करता बेधडक उडी मारायची, हवी ती स्वप्नं पाहायची आणि त्यांचा पाठलाग करायचा. दुसरं टोक आहे ते म्हणजे आपल्या मर्यादा ओळखून स्वप्नं पहायची, किंबहुना स्वप्नांना सुद्धा कुंपण घालून ठेवायचं, आपण काय करू शकतो आणि काय नाही ते साधा प्रयत्नसुद्धा न करताच ठरवून टाकायचं, काही गृहितकं मनात घेउनच आपली वाट चालायची. आणि आपण बहुतेक वेळा या दोन टोकांच्या मध्यावर लटकत राहतो आणि आपलं जीवनसुद्धा तसंच लटकत राहतं. स्वप्नं तर मोठी पाहतो पण त्यांचा पाठलाग करायची हिंमत आपल्यात नसते. अनोळखी प्रदेशात पाऊल ठेवायलासुद्धा घाबरतो आपण. आपल्याला थ्रिल हवं असतं पण सुरक्षेचं कवच पांघरूनच. कसलं विरोधाभासी वास्तव आहे, नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा