पृष्ठे

मंगळवार, ५ मे, २०१५

माणसानं आशावादी जरूर असावं. कसल्याही कठीण प्रसंगी प्रचंड आशा उराशी बाळगावी. पण ती आशा आपलं जगणं तोलून धरण्याएवढीच असावी. तिच्या बळावर स्वप्नांचे इमले रचण्याचा प्रयत्न करू नये. कारण ते इमले जेव्हा कोसळतात तेव्हा पायाखालची जमीनसुद्धा सरकते आणि साधं उभं राहायलाही आधार उरत नाही. 

सोमवार, ४ मे, २०१५

आयुष्याशी तह करायचा की बंड करायचं हे एक सनातन कन्फ्युजन आहे. तडजोड मनाला पटत नाही आणि बंड बुद्धीला व्यवहारी वाटत नाही. या गोंधळात आयुष्य मात्र अधांतरी लटकत राहतं, अस्तित्वातच नसलेला सुवर्णमध्य शोधत. 

एक स्वप्न

मरणाच्या दरीत कोसळताना 
जगण्याचा पुन्हा मोह झाला 
डोळ्यांदेखत माझ्या अन 
चक्काचूर हा देह झाला 

त्या नसण्यातही एक असणं होतं 

जसं जगताना असून नसणं होतं 

पण रात्र सरली स्वप्न भंगून 

अस्तित्व पुन्हा मूर्त झालं 
असण्याचा उन्माद घेऊन 
जगणं पुन्हा धूर्त झालं