पृष्ठे

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

पण शब्द…

एक विचार मनात येतो
कविता होऊ पाहतो 
पण शब्द… 

एक भावना ओथम्बुन वाहते 
प्रकट होऊ पाहते 
पण शब्द… 

एक गहिवर गळ्यात दाटतो 
अश्रूंचा बंध फुटतो
पण शब्द… 

एक आनंद मनात साठतो 
अगदी गगनाला गाठतो 
पण शब्द… 

एक स्तब्धता मनात शिरते 
संध्याकाळ एकाकी उरते 
पण शब्द… 

पण शब्द 
हरवून जातात कुठेतरी 
नकळतच केव्हा 
किंवा नसतातच ते तिथे 
हवे असतात जेव्हा 

सोमवार, २० एप्रिल, २०१५

आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला जाणवतं की आपल्याला उभं राहण्यासाठी सुख, यश, अचिव्हमेंट्स, देव, दैव, समाजमान्यता यांसारख्या कसल्याच कुबड्यांची गरज नाही आणि कधीच नव्हती. आपण आपल्याच बळावर उभे आहोत आणि राहू शकतो, स्वयंभू असे. आपण आपल्यातच एक विश्व असतो. गरज असते ती जरा अंतर्मुख होऊन विचार करण्याची. स्वतःशीच संवाद साधण्याची.