पृष्ठे

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

अशाच एका अवघड वळणावर...

वर्ष २००८. नोव्हेंबर महिन्यातली एक थंड सकाळ. आठ-साडेआठचा सुमार. मी वारजे नाक्याच्या बस स्थानकावर बसची वाट पाहत उभा होतो. डेस्टीनेशन होतं कर्वे पुतळा. तिथे एका कंपनीत मला VLSI design engineer म्हणून जॉब मिळाला होता आणि आज दुसराच दिवस होता. पण मागच्या काही दिवसांच्या घडामोडी पाहता त्या फडतूस कंपनीत काम करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. म्हणजे अगदी एक क्षणही नाही आणि तो जॉब सोडायचाच विचार करत होतो मी. पण हा निर्णय घेणं फार अवघड जात होतं. कारण तो जॉब सोडल्यानंतर माझ्या हाती काहीच राहणार नव्हतं, मी बेकारांच्या गर्दीत सामील होणार होतो -किती दिवसांकरता ते माहिती नाही. याच जॉब साठी मी TCS च्या ऑफरवर पाणी सोडलं होतं. आणि आता हेही सोडणार म्हटल्यावर मला सगळे वेड्यातच काढणार अशी भीतीही होती. आई-अण्णा काय म्हणतील? मित्र काय म्हणतील? लोक काय म्हणतील? आणि मुख्य म्हणजे हा जॉब सोडून पुढे काय? विचारांचं वादळ माजलं होतं डोक्यात. या विचारांच्या दरम्यान किती बसेस निघून गेल्या कुणास ठाऊक? मग मला आई-अण्णांची खूप आठवण यायला लागली. सरळ जाऊन आईच्या मांडीवर डोकं ठेऊन मनसोक्त रडून घ्यावसं वाटायला लागलं. पण कधी कधी नियती आपल्याला आपल्या दुःखात डुंबायलाही पुरेसा वेळ देत नाही. सकाळचं ते कोवळं उन, तरुणाईनं गजबजलेला तो bus stop , ते पुणेरी वातावरण यांपैकी कोणतीच गोष्ट मनाला समाधान देऊ शकत नव्हती. मनात विचारच विचार अगदी उतू जात होते. मग मी घरी कॉल केला. सगळी परिस्थिती अण्णाजवळ वर्णन केली. आणि अहो आश्चर्यम! अण्णांनी एका क्षणाचाही विलंब न करता मला हवा तो निर्णय घेण्याची परवानगी दिली. मला ही अपेक्षाच नव्हती. आता मला खूप बरं वाटलं.  आता आभाळ अगदी स्वच्छ होतं. ढग कुठल्या कुठे विरून गेले होते. सूर्य अगदी तेजाने तळपत होता. आपल्या पाठीशी कुणीतरी आहे ही जाणीवच खूप महत्त्वाची असते. अवघड प्रसंगात नुसते सल्ले देणारे खूप असतात पण तेव्हा 'पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ' म्हणणारे हवे असतात, आपला निर्णय चूक कि बरोबर हे विश्लेषण करीत बसण्यापेक्षा आपल्या पाठीशी राहणारे हवे असतात. आणि ते जर आपले आई वडील असतील तर कसल्याही संकटाला अगदी निर्भयपणे तोंड देण्याचं सामर्थ्य अंगी येतं. 

जॉब सोडायचा निर्णय तर झाला होता. आता कंपनीत जायचं नव्हतं. मग जाणार कुठे? कसल्याच ध्येयाशिवाय मी बसमध्ये चढलो. कर्वे पुतळ्याजवळ उतरलो. कशासाठी? काही माहिती नाही. उतरून काय करावं, कुठे जावं काही काळात नव्हतं. इथेही नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ होती. सकाळची वेळ असल्याने ऑफिसला जाणारे लोक , शाळेत जाणारी मुले-मुली यांची धावपळ चाललेली. त्याच गर्दीत IT वालेही गळ्यात कंपनीचे पट्टे बांधून ऐटीत मिरवत होते. मी त्या गर्दीचा भाग होतोही आणि म्हटलं तर मुळीच नव्हतो.  आता माझ्याकडे वेळच वेळ होता. माझ्या सर्वच क्षणांवर फक्त आणि फक्त माझाच अधिकार होता. मी कर्वे पुतळ्यापासून दशभुजा गणपती मंदिराकडे निघालो. पायीच! ध्येयहीन, भरकटलेल्या नावेसारखा मी. जॉबलेस झाल्याचं दुःख होतं. पण आनंद याचा होता कि मी मला हवं ते केलं होतं. जीवन घेईल ते वळण नाकारून मला हवं त्या मार्गाने जाण्यासाठी मी बंड केलं होतं. रात्रीपासून असलेलं दडपण नाहीसं झालं होतं. 
सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. मी चालत होतो. डोक्यात विचारही चालत होते. भूतकाळातल्या बऱ्याच आठवणी अधून मधून तरळत होत्या. भविष्याची चिंता अधून मधून डोकावत होती. एकंदरीतच 'ये महफिल ये दुनिया मेरे काम कि नही ' अशी धारणा झाली होती. एखादा निर्णय घेतल्यानंतरही त्या निर्णयाच्या चूक-बरोबरपणाविषयीची शंका काही आपली पाठ सोडत नाही. तसंच माझं होत होतं. अधून मधून आपण हे चूक करतो आहोत असं वाटायचं. कारण मागेही काही चुकीचे निर्णय घेतले होते. हा निर्णय चुकणार तर नाही ना असं वाटत होतं. पण तो निर्णय अगदी योग्यच होता कारण मला आयुष्यात तडजोड मान्य नव्हती.  

विचारांच्या तंद्रीत चालत चालतच मी दशभुजा गणेश मंदिराजवळ केव्हा पोचलो याचा पायांना पत्ताही लागला नाही. मग मंदिरात गेलो. हात जोडून गणरायाला म्हणालो तू हे जे काही भोग दिलेस त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. आयुष्यात आता समोर फार बिकट काळ दिसत आहे. त्याला तोंड देण्यासाठी सामर्थ्य दे. तूच अशी बुद्धी दिलीस आता आयुष्याला भिडण्याची शक्तीही तूच दे. आणि मग ते मंदिरातलं प्रसन्न वातावरण, उदबत्त्यांचा मंद दरवळ, घंटांचा मधूनच उठणारा अनाहत नाद यांच्या "अमृततुल्य" संयोगाचा उपभोग घेत बराच वेळ मी तिथे बसून होतो.  किती वेळ   माहिती नाही...!

सोमवार, १० सप्टेंबर, २०१२

पाऊस

काही वेळापूर्वीच ढग आले, हवेतला कोरडेपणा जाऊन थोडासा दमटपणा आला, वारा वाहायचा थांबला, ढग एक एक करून आकाशात गर्दी करू लागले मग झाकोळून आलं-अगदी अंधारून-आणि सर्वांनी मिळून एकच ठराव संमत केला. त्याच्या जल्लोषात सर्वांनी कडकडाट केला आणि एकच वर्षाव सुरु झाला. आता लहान मोठे थेंब वेगाने जमिनीवर येत आहेत. बाणांच्या वर्षावासारखे. झाडांना,त्यांच्या आश्रयाला असलेल्या पक्ष्यांना, पानांना, गवताच्या पात्यांना, फुलांना, घरांना, रस्त्यांना, वाटांना, त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अगदी सर्वांनाच चिंब चिंब भिजवून ते थेंब जमिनीवर ओघळत आहेत. सृष्टीला न्हाऊ घालत आहेत. चैतन्याचाच वर्षाव हा. झाडांच्या ढाली फुटून गेल्या आहेत. त्याखाली आश्रय घेतलेली माणसे आता दुसरा आश्रय शोधत आहेत. होस्टेलच्या गच्चीवर स्वैर संचार करणारी माकडं बिचारी आपल्या पिलांसहित कुठे लपून बसली कुणास ठाऊक. galleryला असलेल्या लोखंडी गजांच्या खाली थेंबांची एक रंगच तयार झाली आहे. पलीकडचा निसर्गाचं त्यांत सूक्ष्म प्रतिबिंब दिसतंय. हवेत मस्त गारवा आलाय. होस्टेलच्या पटांगणात असलेली सगळी झाडे पाणी पिऊन तजेला आल्यासारखी दिसतायत. जिकडे पाहावं तिकडे हिरव्याच हिरव्या रंगाच्या छटा. मध्येच कुठे कुठे पिवळा रंग डोकं वर काढून जणू निसर्गाच्या प्रगल्भतेची साक्षच देतोय. एकदम प्रसन्न वाटतंय. 

रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

देव


खरं तर तो कसा आहे, कुठे असतो, कसा दिसतो, काही काही आपल्याला माहिती नाही. तरीही आपण त्यावर विश्वास ठेऊन असतो. का? काही जन श्रद्धेपोटी, काही जन संस्कारांपोटी आणि बरेच जन गरजेपोटी विश्वास ठेवतात देवावर. होय गरजेपोटीच. आपल्याला देवाची गरज आहे. आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी, आपल्या दुःखात आपली साथ करण्यासाठी, वेळप्रसंगी मदतीला धावून येण्यासाठी आणि कधी कधी आपल्याच नाकर्तेपणाचं, आळशीपणाचं, चुकांचं, हतबलतेचं खापर फोडायला हक्काचं डोकंही त्याचंच हवाय आपल्याला.

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

customized नवरा/बायको


matrimony वेब साईट्स वर एक फेर फटका मारला कि पुष्कळ मनोरंजन होतं. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी वधु  वरांच्या  profilesवर एक नजर टाका. काय असतात त्यांचे expectations भावी जोडीदाराकडून? आणि त्यांचे qualifications  पण भारीच असतात. अक्षरशः काहीही लिहिलेलं असतं. एक उदाहरण देतो. एका मुलीच्या profile वर तिचं शिक्षण काय असेल तर कसली तरी पदवी. इथपर्यंत ठीक आहे. पुढे टंकलेखन पदविका आणि typing speed पण mention केलेली होती. आता त्याची काय गरज. म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला बायको हवी कि typist cum सेक्रेटरी. अजून एक उदाहरण आहे. एका महाशयांनी त्यांच्या expectations  मध्ये काय लिहावं? तर मुलगी convent educated हवी. आता याला काय म्हणाव? त्याला नक्की लग्नच करायचंय कि काय अशी शंका यावी. एका लिमिट पर्यंत अपेक्षा वगैरे ठीक आहे पण हे असलं convent educatedच हवी/हवा  किंवा अमुक अमुकच पदवि अभ्यासक्रम केलेली/ला  हवी/हवा किंवा डॉक्टरच/इंजिनिअरच हवा/हवी अशा गोष्टींना काही अर्थ नाही. हे म्हणजे customized laptop किंवा आणखी दुसरा कुठला तरी इलेक्ट्रोनिक product विकत घेतल्यासारखं  आहे. म्हणजे मला या configurationची मुलगी बायको म्हणून हवी किंवा मला या particular configurationचाच मुलगा नवरा म्हणून हवा आहे असं म्हटल्यासारखं आहे. माणसं अशी customize  करून थोडीच मिळतात? मग घटस्फोट होतील नाही तर काय? 

यश

या जगात काही लोक भयंकर यशस्वी होतात. त्यांच्या यशास त्यांचे प्रयत्न, चिकाटी, कौशल्य इत्यादी सहाय्यभूत असतातच पण सोबतच काही परिस्थितीजन्य गोष्टीही कारण असतात. आणि इतर बरेच जण हे त्यांच्या यशाचे गोडवे गाण्यात आणि त्यांच्यासारखेच यश मिळावे असे इच्छिण्यातच धन्यता मानतात. यशस्वी लोकांचे यश appreciate करायला माझा विरोध नाही पण त्यांचा formula वापरून आपणही यशस्वी होऊ हा समाज करून घेणे अत्यंत चुकीचे आहे कारण यशाचा कुठलाही formula  नसतो. आणि आपण कुणाला यशस्वी म्हणतो हेही जरा तपासून पहिले पाहिजे. विचार केला तर आपल्या लेखी उद्योजक, चित्रपट कलाकार, क्रिकेट खेळाडू, किंवा तत्सम  कुणी तरी ज्यांनी अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे हेच लोक यशस्वी आहेत. यश हे आपण पैशातच मोजतो हि वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आपले आदर्श हे एक तर श्रीमंत किंवा प्रसिद्ध लोक आहेत. माझा या लोकांना किंवा त्यांच्या प्रसिद्धीला किंवा श्रीमंतीला विरोध आहे असं समजण्याचं काही कारण नाही.  विरोध आहे तो आपल्याच काही मातांना आणि ग्रहांना. सध्या फेसबुकवर एक quote शेअर होतोय - "You are successful when people start searching your name in google instead of facebook" -असाच काहीसा . म्हणजे प्रसिद्धी हे तुमच्या यशाचं मोजमाप . काय अर्थ आहे का या असल्या विचारसरणीला? यश हे प्रत्येकाला प्रसिद्धी देऊ शकत नाही आणि त्याची गरजही नसावी . त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत . कुणासाठी रोज सकाळी लवकर उठणे हे यश असू शकते , कुणासाठी चांगले नातेसंबंध हे यश असू शकते. यश हे शेवटी आपल्या आत असतं, बाहेर दिसतं ते फक्त त्याचं प्रतिबिंब. ते सर्वांना दिसतंच असं नाही. यशाला प्रसिद्धीचं वलय असावं लागत नाही. मागे आमच्या ब्रम्हपुत्रा होस्टेलच्या कल्चरल फेस्टीवलच्या  वेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी एक गोष्ट सांगितली होती . आसाम मध्ये कि तिकडेच कुठे एका निर्जन आणि उजाड बेटावर कुण्या एकट्यानेच वनराई फुलवली. त्याचं संपूर्ण आयुष्य तो हेच करत होता . हे यश आहे . निखळ यश. कसल्याही प्रसिद्धीची अभिलाषा नाही, कसलाही उन्माद नाही.