पृष्ठे

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

प्रश्न...

जन्माला येणं ते कशासाठी, काय म्हणून? ही शिक्षा कि वरदान? जगणं तेही कोण्या करणे ? केवळ मरण येत नाही म्हणून? अन हे अज्ञान तरी का म्हणून आणि जर उत्तरेच मिळणार नसतील तर हे डोक्यात येणारे प्रश्न तरी कशासाठी? देव कोण आहे आणि तो आमच्यापासून असा लपून-छपून का राहतो? आम्ही काय गुन्हा केलाय? मुळातच तो आहे कि नाही? आहे म्हणावं तर बुद्धी त्याच्या अस्तित्वावर हजारो प्रश्नांचं कुंपण चढवते आणि नाही म्हणावं तर मन हट्टाला पेटून त्याचं अस्तित्व मान्य करायला लावतं. सत्य मात्र मन आणि बुद्धीच्या वादात न पडता दूर कुठेतरी दृष्टीक्षेपाच्या पार पलीकडे उभं असतं.  आधी अस्तित्वासाठी लढणं, मग ते टिकवण्यासाठी आणि एकदा का ते शाश्वत झालं कि मग समृद्धीसाठी धावणं हे असं अविरत चालू असतं. 

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१२

संकीर्ण....


(डोक्यात जरा जास्तच थैमान चाललं होतं. म्हटलं चला शब्दांकित करू...)

संस्कार किंवा आपली जडणघडण हे एक प्रकारचं प्रोग्रामिंग असतं. लहानपणापासून आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे अनुभवतो ते सर्व आपल्या विचारांची, आपल्या मतांची दिशा ठरवीत असतात. पण केवळ बाहेरच्या गोष्टी किंवा आपल्या अवतीभवतीची परस्थिती आपल्या बुद्धीचा ताबा घेता कामा नये. जे काही म्हणून आपण ग्रहण करतो त्यावर चिंतन होणे, त्याची सत्य-असत्यात पडताळून पाहणे, ते कोणत्या काळी कोणत्या स्थळी लागू होतात हे पाहणे आवश्यक आहे. ते व्हायला हवे. नाहीतर ज्यांना आपण आपली मते म्हणतो ती आपली असत नाहीत.  ती आपल्यावर पडलेले केवळ प्रतिबिंब असतात. ती मते किंवा विचार किंवा विचारप्रवाह आपणाला कुण्या एका परिस्थितीत पटलेली असतात आणि आपण केवळ त्या मतांचे वाहक असतो. आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा बरेच लोक घेतात. आपण पाहतो आपल्या अवतीभवती किती तरी विचारप्रवाहांचे समूह आढळून येतात. राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक असे बरेच कंगोरे असलेले समूह. आणि आपल्या समाजात नेमकं हेच होतंय.  या काही वर्षांत किंवा मागच्या दशकात होणाऱ्या घटनांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तर काय दिसून येतं? एक समाज म्हणून आपण कुठे जात आहोत? मला वाटतं एक समाज म्हणून आपलं अस्तित्वच नाही. रेल्वेस्टेशन वरच्या प्रवाशांसारखे आपण समाजात वावरत असतो. आपण आणि केवळ आपण एवढाच विचार आपल्या डोक्यात असतो. बाकीच्यांशी काही देणं-घेणं नाही. आपण राजकीय दृष्ट्या उदासीन आहोत, सामाजिक दृष्ट्या संवेदनहीन आहोत, सांस्कृतिक दृष्ट्या बाळबोध आहोत, धार्मिक दृष्ट्या असहिष्णू आहोत. आपल्या जे नेतृत्व लाभतं तेही आपल्याचमधून आणि तेही मग तसंच असतं - दिवाळखोर, भ्रष्ट, संवेदनहीन. जे राजकारणात आहेत त्यांना समाजाशी काही देणं नाही. ते आपल्याच पिशव्या भरण्यात मग्न आहेत. आणि बाकी बराच समाज ज्याचा राजकारणाशी तसा सरळ सरळ संबंध नाही तो राजकारण म्हटलं कि नाक मुरडतो. 

आम्हांला एकदम क्रांती हवीय, बदल हवाय. पण तो घडवून आणायला आम्ही तयार नाही. तो दुसऱ्या कुणी तरी घडवून आणावा. उत्क्रांतीची वाट पाहत थांबायची आमची तयारी नाही. साधं वेबपेज लोड व्हायला वेळ लागत असेल तर उद्विग्न होणारी आमची पिढी. संयम कशाला म्हणतात हे आम्ही मुळी विसरूनच गेलोत. प्रत्येक गोष्ट घडायला वेळ लागतो हे मान्यच नाही आम्हांला. गर्दीचा फायदा घेऊन घोषणा देणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. स्वतःची मते नाहीत, विचार नाहीत, असले तरी ते डळमळीत, त्यांच्यावर ठाम राहता येत नाही, कुणी त्याविरुद्ध विचार ठामपणे सांगितले कि तेही आम्हांला पटतात आणि मग आपला काय चूक होतं हेही आम्हांला काळात नाही. कुणीही येऊन टिकली मारून जावं तसं कुणीही येतं आणि आमच्या डोक्याचा भुगा करून जातं. याचं कारण काय? मुळात आम्हांला लहानपणापासून विचार करायलाच शिकवलं नाही. जे आहे ते स्वीकारा. प्रश्न नको. आणि मग आपल्या कारकून बनवणाऱ्या कारखान्यांतून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा कळायला लागतं कि आपण एक माणूस आहोत आणि माणूस म्हणून आपली जडण घडण झालीच नाही....

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२

कासाबला फाशी...

कासाबला फाशी हा एक प्रकारे उशिरा का होईना पण २६/११ च्या शहिदांना 

मिळालेला न्याय आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेत जो वेळ आणि पैसा खर्च झाला त्याचं 

समर्थन नक्कीच करता येणार नाही. हे आधीच व्हायला हवं होतं. त्यासाठी सरकार 

पूर्णतः दोषी आहे. ही फाशी दिली म्हणून सरकारचं अभिनंदन वगैरे करायची काही 

गरज नाही. हा उशीर खरं तर आपल्या व्यवस्थेचा पराभव म्हणता येईल. केवळ 

काही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या किंमतीवर सरकारचं हे पाप धुतल्या जाणार नाहीत



.आणि राजीनामे ते कसले? जनतेची दिशाभूलच होती ती. नेभळट नेतृत्व 



असल्यावर काय होतं हेच यातून सिद्ध झालंय. 




कासाबचा गुन्हा हा स्वयंसिद्ध होता. तो पुन्हा पुन्हा न्यायव्यवस्थेसमोर मांडून अजून 



काय सिद्ध करायचं होतं? आणि मुख्य म्हणजे कुणासाठी ? पाकिस्तानसाठी असेल 



तर अजूनही पाकिस्तान कसाबला त्यांचा म्हणून स्वीकारायला तयार नाही. खरं तर 



कासाब इथे अत्माघातासाठीच आला होता त्यामुळे या फाशीला अतिरेकी संघटना 



कितपत गंभीरपणे घेतील हे सांगता येत नाही. किंबहुना ही गोष्ट त्यांच्या 



खिजगणतीतही नसेल. यावरून त्यांनी एक धडा मात्र घेतला असेल कि जर 



भारतावर हल्ला करून तुम्ही पकडला गेलात तर तुम्हाला कमीत कमी दोन तीन वर्षे 



तरी सरकारचा पाहुणचार मिळतो.

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

हे आज घडतंय कि पूर्वीही होतं माहिती नाही पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय ती अशी कि स्वतःला नास्तिक म्हणून घेण्यात धन्यता मानणाऱ्यांची संख्या जरा वाढतच आहे. अन देव मानणे, मंदिरात जाणे वगैरे मागासलेपणाचं लक्षण समजलं जातंय. म्हणजे सर्वांनी आस्तिक असावं असं मी म्हणत नाही पण आस्तिकता आणि नास्तिकता या दोन विचारधारा आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे. खरं तर आपण कसे आहोत आपल्या श्रद्धा काय आहेत यापेक्षा परिस्थितीनुसार स्वतःला प्रेझेंट करणं चाललंय. केवळ  नास्तिकताच पुरोगामीपणाची निदर्शक मानणाऱ्या समाजाकडे आपली वाटचाल होतेय. एक टोक आहे धर्मांध लोकांचे ज्यांना आपल्या धर्माशिवाय सगळेच निधर्मी दिसतात आणि दुसरे टोक आहे धर्म अफूची गोळी मानणाऱ्यांचे. यांना धर्म, देव नाव घेताच शिरशिरी येते. आणि यांच्यामध्ये काही जण आहेत जे 'आम्ही धर्मांध नाही' हे दाखवण्यासाठी स्वतःच्याच श्रद्धेला कडी लावतात किंवा चार-चौघात तसं दाखवतात आणि त्या दुसऱ्या टोकाकडे धावत सुटतात. आणि हे लोक स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवतात. विज्ञान काय आहे हे माहिती असो कि नसो. काही अंशी याचे श्रेय हे पश्चिमेचे अंधानुकरण करण्याच्या आपल्या घाणेरड्या प्रवृत्तीला जाते. 

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

भुतं


बऱ्याच गावांत असतात तशी आमच्याही गावातसुद्धा काही (ग्राम देवतांसाराखी) ग्रामभुतं आहेत आणि त्यांच्या काही आवडत्या जागा आहेत. त्या जागांची नावे घेताच भीती वाटायला लागते. आमच्या शेताच्या जवळ कॅनॉलच्या दिशेला भगवती म्हणून असंच एक भुतांचं वसती स्थान आहे.  दुरून बघितल्यावर कसल्या तरी टेकड्या दिसतात तिकडे.  खरं तर तो भाग दिवसाही निर्जन असतो आणि रात्री तर फारच भयावह होतो.  तिकडे कुणाकुणाला भुताने दर्शन दिल्याचं ऐकिवात आहे. ती भुतं कॅनॉलमध्ये वाहून आलेल्या लोकांची असावीत असं म्हटलं जातं. पण त्या वाहून आलेल्या प्रेतांना आमच्याच गावी का म्हणून मुक्काम करावासा वाटतो हे एक कोडंच आहे.  अजून अशीच एक जागा म्हणजे आमच्या गावच्या जवळच एक ओढा आहे आणि त्यावर पूल आहे. या भागाला कट्टा म्हणतात. जवळ बरीचशी वडाची झाडे आहेत. त्यामुळे तिथे दिवसाही अंधार असतो. तिथेही काही जणांना भुतांनी दर्शन दिलंय असं म्हणतात. आणखी आवईकडे जाणाऱ्या रस्त्यावर दूर कुठेतरी दिसणाऱ्या एका आंब्याच्या झाडावरसुद्धा एक भूत आहे म्हणतात. परत आमच्या मळ्यात खोकाड्या विहिरीत कुणा जीव दिलेल्या बाईचं भूत आहे म्हणतात. त्या विहिरीजवळच एक चिंचेचं झाड आहे ते भूत कधी कधी त्या झाडावरसुद्धा आढळून येतं.  तर भगवती, कट्टा, आंब्याचं झाड, खोकाडी विहीर, तिच्या जवळचं ते चिंचेचं झाड ही असली भूतांची वसती स्थानं. मला कळत नाही भुतं असल्या अवघड ठिकाणी म्हणजे झाडांवर, विहिरीत कशाला राहत असतील. 

या असल्या जागा प्रत्येक गावी असतात आणि देवादिकांच्या नाही तेवढ्या या भुतांच्या कथा सांगितल्या अन ऐकल्या जातात. कधीकधी काहीजण मंदिराच्या कट्ट्यावर किंवा चावडीवर बसून त्यांचे स्वतःचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे भूतदर्शन वर्णन करून सांगत असतात.आपण भूत कधीही पाहिलं नसलं तरीही त्याच्या विषयी काही प्राथमिक माहिती आपल्याला त्यातून मिळते. आणि सुदैवाने भूत दर्शन झालेच तर कोणते प्रोटोकॉल्स पाळायचे याचीही माहिती मिळते. या कथा ऐकायला सुरस वाटतात. पण मग त्या ठिकाणांहून जायची वेळ आली कि मी मी म्हणणाऱ्यांचीसुद्धा भीतीने गाळण उडते.

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

कविता, आठवणी अन पावसाळा



का कुणास ठाऊक पण कविता, आठवणी अन पावसाळ्याचं एक अजब नातं आहे. कदाचित पानगळीनंतर येणाऱ्या पावसाळ्यात झाडांप्रमाणेच मानवी मनालाही चैतन्याची पालवी फुटत असते म्हणून असेल. 


कवितेचं विश्व अमर्याद असतं. कविता वाचताना आपण प्रेत्येकजण आपापल्या अनुभवानुसार एक विश्व उभे करीत असतो. आपण आपल्याच आठवणींशी कवितेची सांगड घालण्याचा प्रयत्न करीत असतो. अन मनाच्या खोलवर कुठेतरी धुसरलेल्या आठवणीही हळूहळू डोकाऊ लागतात. मग आपण अलगद त्या आठवणींच्या रम्य प्रांती जातो. अन त्या आठवणीही अशा कि एकीसोबत दुसरी येते मग तिसरी. असं खूप वेळ चालत जातं. मला म्हणाल तर आठवणींच्या राज्यातून बाहेरच यावंसं वाटत नाही. तिकडेच रमावंसं वाटतं. मस्त कविता वाचाव्या अन आठवणी अन स्वप्नांच्याच दुनियेत रमून जावं तासन-तास. पण इकडेही कर्तव्य असतं आपली वाट बघत अन मोठ्या मुश्किलीनं इकडे परतावं लागतं. 

इथे ना धो महानोरांच्या "पावसाळी कविता" या कवितासंग्रहातली एक कविता मला आठवते 

पाऊस येताना घेऊन येतो दर सालच्यावाणी 
हिमगर्द वर्षावात भिजून जाणारी पावसाची गाणी 
तरंगत जाणाऱ्या डोळ्यांच्या हिंदोळ्यात हळुवार सावनी 
सावल्यासावल्यांनी उतरून येणाऱ्या जुन्या आठवणी