पुस्तक वाचण्यातली जी मजा आहे ती चित्रपट पाहण्यात नाही. पुस्तक वाचताना वाचक त्याच्या मर्जीनुसार चित्र रंगवू शकतो. पुस्तकातले सगळेच अनुभव वाचकाने घेतले असतीलच असं नाही पण तरीही आपापल्या अनुभवांशी सांगड घालण्याचा त्याचा प्रयत्न असतो. चित्रपटात मात्र ते कल्पनास्वातंत्र्य नसतं. तिथे डायरेक्टरच्या डोक्यात जे येईल ते प्रेक्षकांना पाहावं लागतं. उदाहरणादाखल व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडी मधला हा उतारा पहा
"बघता बघता काळोख नाहीसा झाला. दिसू लागले. झाडेझुडपे, दगडगोटे यांना आकार आला. चांदण्या दिसेनाशा झाल्या. रातकिड्यांचे गाणे थांबले. झोपेतून जाग्या झालेल्या कावळ्यांची जाड कावकाव ऐकू आली. तांबडा पिवळा सूर्य माळाआडून वर आला. हिरवट प्रकाशाला पिवळी झळाळी आली. बोरींच्या झुडपात बसून राहिलेल्या सातबाया जाग्या झाल्या. शेपटी नाचवून कलकलू लागल्या. … "