पृष्ठे

बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

नीलम


चेन्नई (दि.३१ ऑक्टोबर २०१२; वेळ सायं ३:५०)
आम्ही आता आमच्या रूम मध्ये बसून 'नीलम'ची वाट पाहतोय....! नीलम म्हणजे इथे चेन्नईत येऊ घातलेलं चक्रीवादळ. त्याची लक्षणे कालपासूनच दिसू लागली आहेत. आज सकाळपासून जोराचे वारे वाहत आहेत. कॅम्पसमधली काही मी मी म्हणणारी झाडेही उन्मळून पडली आहेत. कॅम्पस मधल्या रस्त्यांची पार दुरवस्था झालेली आहे. झाडांच्या फांद्या, पाला-पाचोळा पडून रस्ते हिरवे झाले आहेत. आणि वरून पावसाची रिमझिम सुद्धा चालू आहे पण वाऱ्यामुळे छत्री बाळगायला स्कोप नाही आणि त्यामुळे बाहेर पडल्यास भिजणे अपरिहार्य. संध्याकाळी जेवायला बाहेर कसे पडावे याची चिंता आम्हांला लागली आहे. वाऱ्याचा वेग वरचेवर वाढतच आहे. नीलम संध्याकाळी पाचच्या सुमारास इथे येऊन धडकेल. पाहू तरी ताशी १०० किमी वेगाचे वारे कसे वाहतात ते. कॅम्पसबाहेर सुटी जाहीर झाली असली तरी आत मात्र कामकाज चालू आहे.  आमचे आजचे तीनही क्लासेस सकाळी झाले. त्यामुळे आता आम्ही आमच्या रूमवर आहोत. दुपारच्या सेशनमधले क्लासेस त्यांच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होत आहेत. खाली होस्टेल ग्राउंडवर क्रिकेटचा डाव रंगात आलाय. बरीच मंडळी आमच्याप्रमाणेच आपापल्या रूम्स मध्ये दडून बसलेली आहेत. आणि आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार वायरलेस ग्रुपची काही अति हौशी मंडळी समुद्र किनारी फिरायला गेली आहेत.

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

परिप्रश्नेन

जीवनाचं सार्थक कशात आहे? जे हवं ते मिळवण्यात कि उच्च कोटीच्या वैराग्यात? कशाचीही अभिलाषा नसणं हे परमोच्च मानसिकतेचं लक्षण म्हणून गौरवायचं कि माणसाच्या आळशीपणाशी त्याचा संबंध जोडून मोकळं व्हायचं? जन्मलो तेव्हा राग, लोभ, मोह, अभिलाषा, ध्येयं, स्वप्नं, महत्त्वाकांक्षा असं काहीच चिकटलेलं नव्हतं. मन अगदी कोरं करकरीत होतं. अगदी निर्लेप. पण मग जसजसा जगाशी संपर्क आला तसतशी ही भुतं मानगुटीवर बसत गेली. या ओझ्यानंच कित्येक जण शून्यात परतते झाले. जे राहिले ते त्या ओझ्याखाली दबले जात आहेत. या सर्वांहून मुक्त असा अवधूत होणं कुणाला जमलंय का आणि जमेल का? कि सगळेच ओझीवाहू  हमाल? 

कुठून आलोय कुठे जातोय काही माहिती नाही. तरीही चालतच जातोय. कारण तेच एक करण्याची मुभा आहे. थांबणं ते आता शेवटीच एकदा. कधी राना-वनांतून, पानाफुलांतून, कधी डोंगर-दऱ्यांतून, कधी लांबच लांब पसरलेल्या वाळवंटातून. चालणं एकच आपल्या भाळी. चालत चालत होता होईल तेवढं जागून समृद्ध व्हायचं. का म्हणून विचारणार कुणाला? 'तो' आहे असं आम्ही मानतो पण तो कुठे आहे हे कोण सांगणार? आणि असा लपून-छापून का असतो तो? त्याचं नेमकं स्वरूप कसं हे आम्ही कसं जाणायचं ? असे आजवर अनुत्तरीत राहिलेले असंख्यच असंख्य प्रश्न कधी कधी उद्विग्न करतात. 

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

शब्देवीन



ज्ञानेश्वरांची कुठलीही रचना, मग ती ज्ञानेश्वरी असो कि ओव्या असोत किंवा अमृतानुभव वा चांगदेवपासष्टी असो, सात्त्विक आनंददायी असते. तो आमोद वर्णावया शब्दही थिटे आणि आम्हीही थिटे. किंबहुना त्या आनंदा वर्णावया शब्दांची गरजच उरत नाही. सारे शब्दांच्या अतीत. केवळ अनुभवच. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं तर इंद्रियेही नेणती असा अनुभव. 

हे शब्देवीन संवादिजे | इंद्रिय नेणता भोगिजे |
बोलाआधि झोंबिजे | प्रमेयासी ||

जैसे भ्रमर परागु नेती | परी कमळदळे नेणती |
तैसी परी आहे सेविती | ग्रंथी इये ||

या गीतेचे वर्णन करणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या त्यांच्या स्वतःच्याच प्रत्येक साहित्यकृतीला तितक्याच लागू होतात. 

त्यांच्या साहित्याब्धीमध्ये डुंबताना आपल्या आचार-विचारांचीही उंची किंचित वाढल्याचा आभास होतो. कारण आपला क्षुद्रपणा आपल्या ध्यानी यायला लागतो.