पृष्ठे

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

अलबेल

तसं सगळं अलबेल आहे 
म्हटलं तर सगळं सेटल आहे
तरीही एक हुरहूर आहे
काही एक राहून गेल्याची
आणि जराशी खंतही आहे
क्षण काहीसे वाहून गेल्याची
बाकी सगळं अलबेल आहे 
जवळपास सगळं सेटल आहे

रविवार, २ जुलै, २०१७

आठवण

आठवण तुझी येते आणि 
शब्द कविता होऊन जातात 
विरहात मग भिजून चिंब 
शब्द सरिता होऊन जातात

शनिवार, १ जुलै, २०१७

माणूस म्हटलं की चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही आलंच. गुणावगुण हे मानवी स्वभावाचे भागच असतात. पण जेव्हा एखाद्याच्या मनाचा ठाव घ्यावा तेव्हा कळतं की प्रत्येकच माणूस हा स्वतःमध्ये अनुभूतींचं, त्यातून येणाऱ्या जाणिवांचं आणि संवेदनांचं एक अफाट, अमर्याद विश्व असतो. शब्दांत बांधता येणारच नाहीत एवढे अनुभव, भावना, विचार, मते, कल्पना प्रत्येकाच्या मनात असतात. अभिव्यक्तीचं भाग्य प्रत्येकाला लाभतंच असं नाही. बऱ्याचजणांसोबत त्यांचं ते समृद्ध विश्वही काळाच्या पडद्याआड जातं हे आपलं- मानवजातीचं- दुर्भाग्यच म्हणावं लागेल.