पृष्ठे

शनिवार, २८ जुलै, २०१२

एक प्रसन्न पावसाळी सकाळ

पहाटेचे पाच साडेपाच वाजलेले आणि अजूनही पेंगत असलेलं हॉस्टेल आणि झोपेतच असलेली सृष्टी. अशा एकंदरीतच झोपाळू वातावरणात झोपेतून उठणं म्हणजे एक दिव्यच. पण एकदा का ते दिव्य पार पाडलं आणि जरा फेरफटका मारायला बाहेर पडलो कि नजरेस पडते ती एक प्रसन्न पावसाळी सकाळ; हिरव्या वनराईच्या कुशीत वसलेला आणि अजूनही निपचित पडलेला IIT मद्रासचा सुंदर कॅम्पस; रात्रीच्या पावसामुळे हवेत, रस्त्यांवर, झाडा-झुडुपांवर आणि एकूण एक गोष्टींवर पसरलेला ओलावा; रस्त्याच्या आजू बाजूला अगदी निर्भयपणे फिरणारी हरणं; झाडांवर उड्या मारणारी माकडं; jogging करणारे आमच्यासारखे अल्पसंख्यांक; त्यांना मध्ये मध्येच कुठेतरी साथ करणारी कुत्री; हवेची झुळूक आल्यावर पाण्याचा शिडकावा करणारी झाडं असं एकूणच प्रसन्न वातावरण. 

बुधवार, २५ जुलै, २०१२

अश्वत्थ

आमच्या मामाच्या शेतात एक भला मोठा, पर्वताएवढा, कित्येक वर्षे जुना असा एक पिंपळवृक्ष आहे. लहान असताना बरेच दिवस "वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे" मधला वृक्ष म्हणजे तोच अशी माझी समजूत होती. कारण इतर झाडं त्याच्यासमोर झुडुपं वाटावी एवढा तो भव्य आणि महाकाय आहे. वृक्ष हे नाव सार्थ ठरवणारा. आणि गीतेत कृष्णाने "ऊर्ध्वमूलम अधःशाखं" म्हणून  उल्लेखलेला संसारवृक्ष (अश्वत्थ) सुद्धा मला तोच वाटतो. त्याच्या अनंत शाखा आणि त्यावरची त्या अनन्तापेक्षाही अनंत अशी हिरवी-पिवळी पाने आणि या सर्वांना समर्थपणे पेलणारा त्याचा आठ-दहा फूट व्यासाचा बुंधा आणि त्यांना अन्न पाणी पुरवणारी ती विस्तीर्ण आणि खोलवर पसरलेली त्याची मुळे; त्याची ती घनदाट, काळीभोर, थंड अशी सावली; त्याच्या पानांशी झोम्बणारा वारा आणि मग त्यांचा तो सळसळणारा आवाज; त्याच्या बुंध्याशी शेंदूर फासून बसलेली ती दैवतं; वर त्रिकाळ चालणारा पक्षांचा गलबला आणि वानरांचा उच्छाद; खाली बागडणारे आम्ही; आम्हांवर अधूनमधून 'विहिरीकडे जाऊ नका' म्हणून ओरडणारी मोठी माणसे; आजूबाजूला नजर जाईल तिथवर पसरलेली हिरवीच हिरवी शेतं; भिजवलेल्या रानामधून गार होऊन येणारा वारा; त्याच पिंपळाखाली  सर्वांसोबत बसून खाल्लेली भाकरी, तोन्ड अंबवणारी बोरं, पेरू, जांभळे या आणि अशा लहानपणीच्या कित्येक आठवणी त्या अश्वत्थाशी जुळलेल्या आहेत. 


त्याचं स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे असं मला वाटतं. कित्येक पिढ्या त्याच्यासमोर जन्मल्या, वाढल्या, नांदल्या आणि अनंतात विलीन होऊन गेल्या. त्या सर्वांच्या आठवणी पोटात घेऊन अजून तो त्याचा मार्ग क्रमितच आहे. आणि म्हणूनच कदाचित तो उन, पाऊस, वादळ, वारा आणि क्वचित प्रसंगी माणसे या सर्वांना तोण्ड देत मोठ्या डौलानं शांत, धीरगंभीर आणि  अविचलपणे उभा आहे.....अजूनही....कुटुंबातल्या कुणा खंबीर वयोवृद्ध माणसासारखा. कदाचित आम्हांनंतरही येणाऱ्या कित्येक पिढ्या तो तसाच उभा असेल, मूकपणे. आमच्याही काही थोड्याफार आठवणी आपल्या पोटात साठवून. (इथे गैरसमाज न व्हावा. आम्ही अजून पंचविशीतच आहोत. वृद्ध नाही.) 

गुरुवार, १९ जुलै, २०१२

वेदना (pain)

19/07/2012; 8:50pm 

(इथे मी दुःख हा शब्द शारीरिक दुःख (वेदना) या अर्थाने वापरला आहे. )

आत्ता या क्षणी मी अतिशय जास्त वेदना  अनुभवतोय. त्यांची तीव्रता शब्दांत नाहीच सांगता येत. ते असं आहे कि माझ्या कानात खूप दुखतंय. खूप म्हणजे अगदी प्रचंड. इतकी वेदना मी याआधी कधीच नव्हती अनुभवली. hospital मध्ये जाऊन आलो. डॉक्टरांनी pain killer दिलीय. आणि उद्या ENT सर्जनची appointment घ्यायला सांगितलंय.  पण pain killerचा काही परिणाम नाही झाला अजून तरी. म्हणजे आता सकाळपर्यंत ही वेदनाच माझी सांगाती. म्हणून विचार केला कि या वेदनांना  व्यक्त करून थोडीशी mental relief तरी मिळवावी. म्हणजे काय असतं कि माणूस शरीराने जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याचं मनही आजारी पडतं. आणि वेदनांची तीव्रता अजूनच वाढते. अशा वेळी त्या वेदनांवरही  मात करून माणसाचं लक्ष दुसरीकडे वेधणारी गोष्ट असावी लागते. माझ्यासाठी ती  गोष्ट म्हणजे लिहिणं आहे असं मला वाटतंय. कदाचित pain killerचा परिणाम व्हायला सुरुवात झाल्यामुळे तसं वाटत असेल. असो. 

सावरकरांच्या भाषेत सांगायचं तर "दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल हा निसर्गानेच बांधलेला असतो". मग ते दुःख राईएवढं असो किंवा पर्वताएवढं. व्यक्त व्हावसं वाटणं हे दुःखात नेहमीपेक्षा जास्त असतं . आणि ते एकदाच नाही तर दुःख सारेपर्यंत. पण ज्याच्याजवळ दुःख व्यक्त करावं ती व्यक्ती संवेदनशील असायला हवी. नाहीतर ती अभिव्यक्ती दुःख कमी करण्यापेक्षा ते वाढवते. 

आणि वेदना कधीकधी इतकी जास्त असते की आता कसंही करून यातून सुटका व्हावी असं वाटतं. ती कुठल्याही मार्गाने होवो. अगदी मृत्यूही स्वागतार्ह वाटायला लागतो. म्हणजे मला तसं काही नाही वाटत. पण आता अचानक झोप लागावी किंवा बेशुद्ध पडावं  असे विचार डोकावतात मनात. पण मग वाटतं कि एवढ्या वेदना होऊन सुद्धा आपण शुद्धीवर आहोत म्हणजे तो बेशुद्धीचा threshold खूपच painful असेल. म्हणजे technical भाषेत सांगायचं तर the pain just a moment before unconsciousness. आणि त्यावर असं कि बेशुद्धीमध्ये ती relief अनुभवायला आपण कुठे असतो? आणि शुद्ध आल्यावर त्या वेदना असतातच स्वागताला.

मरणाचंही असंच असतं का? म्हणजे अपरिमित वेदना आणि त्यातच जीवाचा अंत असं? कारण मृत्यू हे एक transition आहे अस्तित्वाच्या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत किंवा कदाचित असण्याकडून नसण्याकडे. मग वेदना या होणारच. उगाच विचार येतो कि अपघातात जखमी झालेल्यांच्या, युद्धात जखमी झालेल्या सैनिकांच्या वेदना कल्पनातीत असतील. आणि असा विचार करूनच दया मरणाला काही देशांत कायदेशीर मान्यता आहे. ती असावी कि नाही हा मुद्दा इथे नाही मांडायचा मला. 

एक गोष्ट मात्र निश्चित-ती अशी कि वेदना किंवा दुःख माणसाला काही काळासाठी का असेना अंतर्मुख बनवतात आणि आत्मपरीक्षण करायला लावतात. दुःखात अगदी दगडासारखा माणूस सुद्धा हळवा होतो.