पृष्ठे

बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

क्षणिक बुद्धत्व

बुद्धत्व - सगळ्या इच्छांपासून मुक्ती, सगळ्या आकांक्षांपासून मुक्ती. बुद्धाचं निर्वाण हे त्याच मुक्तीचं रूप. पण तुम्हाआम्हासारख्यांना तिथपर्यंत पोचत येत नाही. बुद्ध म्हणजे अगदी मुक्तीचीसुद्धा आस नसणे. सगळ्यांनीच निर्वाणाची आस धरली तर ते एक तर बुद्धही होऊ शकणार नाहीत कारण तिथे इच्छा आली आणि दुसरं म्हणजे जगाचा गाडासुद्धा बंद पडेल. पण कधी कधी माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा त्याला काही सत्ये उलगडतात आणि अगदी बुद्धाएवढा नाही तरीही त्याच्या काही अंश म्हणावा एवढा साक्षात्कार होतो. तो तो प्रत्येक प्रसंग माणसाला बुद्धात्वाच्या जवळच घेऊन जातो असं मला वाटतं. ते आपलं क्षणीक बुद्धत्व. मग ते निराशा, दुःख, अपेक्षाभंग इत्यादी कशातुनही आलेलं असेल. तो क्षण खरा असतो, ते वाटणं खरं असतं, तो साक्षात्कार खरा असतो. बाकी प्रत्येक क्षणी आपण स्वतःला फसवत असतो. पण बुद्धत्व म्हणजे नाकर्तेपणा नव्हे. बुद्धत्व म्हणजे संन्यासी होऊन हिमालयात जाणेही नव्हे. बुद्धत्व म्हणजे स्थितप्रज्ञता. बुद्धत्व म्हणजे "कर्मण्येवाधीकारास्ते मा फलेषु कादाचानः".

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५

आपल्या सुख-दुःखांचं, आपल्या अनुभवाचं जे काय कौतुक असतं ते फक्त आपल्यालाच असतं. इतरांना त्याची उब किंवा झळ कधीच पोहचत नाही आणि म्हणूनच त्यातला आनंद किंवा आगतिकता कधी जाणवत नाही. शेवटी त्या बऱ्यावाईट अनुभवातून जो धडा मिळतो त्याचे धनीही आपणच असतो. पण मग तरीही व्यक्त होण्याचा अट्टाहास असतोच आणि तो साहजिकच आहे. आपण ज्या परिस्थीचा सामना केलाय त्याबद्दल कुणीतरी आपली पाठ थोपटावी असं प्रत्येकाला वाटतं. त्याने काही होत नसलं तरीही पुढे अजून लढत राहायला बळ मिळतं. 

बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

मनातल्या आशेला धुमारे फुटत असताना कुठेतरी शंकेची टिटवी किंचाळते आणि परत ते धुमारे करपून जातात आणि घोर निराशा होते. अकारण जशी आशा उगवते तशीच ती लुप्तसुद्धा होते. उसनं अवसान आणलं की असंच व्हायचं. खरं तर आता आनंदातही आनंदी व्हावं की नाही हेच कळेनासं झालंय. स्वतःच्याच आनंदाला स्वतःचीच नजर लागेल ही भीती वाटत असते. जसा क्षणात उन आणि क्षणात पाऊस असा उन पावसाचा खेळ असतो तसं झालंय आशा-निराशेचं, सुख-दुःखाचं. या क्षणीची आशा पुढच्या क्षणी घोर निराशेत रुपांतरीत होते. या क्षणी आनंदी झालं की पुढच्या क्षणी काहीतरी बिनसतं. काही एका गोष्टीसाठी आता आनंदी व्हावं आणि तीच गोष्ट पुढच्या क्षणी नाहीशी व्हावी असं काहीतरी चालू असतं आणि आपला भला मोठ्ठा पोपट होतो नियतीच्या हातून.

(आणि हो, हे वाचून कुणीही प्लीज काय झालं म्हणून विचारू नका राव. काही नाही झालं खरं तर. मी मस्त आहे, मजेत आहे. जरा प्रॉब्लेम चालू आहेत  आणि ते असतातच. मी असं काही लिहितो म्हणजे दिवसभर एकदम उदास वगैरे असतो असं काही नाही. कुठल्या तरी एखाद्या क्षणाचा उमाळा असतो असा. त्याचा असा शब्दंतून निचरा झाला की बरं वाटतं. जेव्हा मी काहीतरी लिहितो तेव्हा मी नॉर्मल आहे हे आसं समजा.)