पृष्ठे

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


रोजच्यासारखीच तरीही एक नवी पहाट, 
एक नवा दिवस, एक नवी सुरुवात, 
नव्याची झळाळी लाभलेली जुनीच स्वप्नं, 
जुन्या दुखण्याचं नव्यानं खूपणं, 
ते सहण्यासाठी नव वर्षीचा नवा सूर्य,
नव्या क्षणांचं नवनिर्मित  ऐश्वर्य.
सगळीकडेच नव्याचा दरवळ. 

या नव्या नवलाईचे भोक्ते असलेल्या आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

निर्जीव कोलाज



प्रत्येक राष्ट्राचा एक आत्मा असतो ज्याच्या बळावर ते राष्ट्र जिवंत असते. इस्राइल, अरेबिअन राष्ट्रे, युरोपिअन राष्ट्रे, चीन, जपान, अमेरिका, रशिया अशी किती तरी उदाहरणे देता येतील. या राष्ट्रांकडे बघितल्यावर एक लक्षात येतं कि काहीतरी गोष्ट त्यांच्यामध्ये आहे जी  तिथल्या लोकांना एकजूट व्हायला भाग पाडते. ती गोष्ट इतिहास असेल, भाषा असेल, कायद्याचे भय असेल किंवा इतर काही असेल. राष्ट्रवाद हा तिथल्या लोकांच्या रक्तात भिनलाय असं म्हणता येईल. आणि आपल्याकडे तो फक्त पक्षाच्या किंवा संघटनांच्या नावापुरताच शिल्लक राहिलाय. आपल्या देशाकडे एक नजर टाकली तर दिसून येईल कि आपल्यालाही वैभवशाली इतिहास आणि संस्कृती लाभली आहे. पण तरीही आपल्या राष्ट्राचा आत्मा म्हणता येईल अशी कोणतीच गोष्ट दिसून येत नाही. लोकांना फक्त आणि फक्त आपला स्वार्थ साधण्याशिवाय काहीच सुचत आणि दिसत नाही. कायद्याचं भय फक्त सामान्य माणसालाच आहे. राजकीय नेत्यांना ना कसला कायदा ना कसली नीती. भारत म्हणजे केवळ इतिहास नव्हे, केवळ आपली संस्कृती नव्हे, केवळ आसेतुहिमाचल पसरलेली भूमी नव्हे. भारत म्हणजे भारतीय मन, भारतीय समाज. तो समाज कुठे आहे या गर्दीत? इथे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आहेत; ओ. बी. सी., एस.सी./एस.टी. आहेत; मराठी, गुजराती, तमिळ, तेलगु, बंगाली आहेत; उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आहेत. सगळे आपापलाच ढोल वाजवत आहेत. आणि या सर्वांहून वेगळे असे काही समूह आहेत उच्चभ्रू म्हणवणारे ज्यांना या सगळ्याशी काही घेणंदेणं नाही. आपण चुकून भारतात जन्माला आलो असं वाटणारा समूहसुद्धा इथे आहे. राजकीय नेते आहेत जे या सगळ्याचा फायदा कसा घेत येईल याशिवाय दुसरा विचार करूच शकत नाहीत. अजून किती ऱ्हास होणार आपला? व्हिजन २०२० वगैरे सगळ्या पोकळ गप्पा आहेत. जिथे सामान्य माणूस आपल्याच शहरात, गावात सुरक्षित नाही तिथे कसल्या विकसित राष्ट्र होण्याच्या गप्पा करता? इथे समाजात जरा काही खुट्ट झालं तरीही सत्ताधारी मंडळी आपापली आसनं सांभाळायला लागतात. विरोधकही काही धुतल्या तांदळाचे नाहीत. तेही त्याच पंक्तीतले आहेत. 

आपण म्हणजे आसेतुहिमाचलावर कोणे एके काळी जिवंत असलेल्या भव्य राष्ट्राच्या कालेवारापासून तयार होऊ घातलेला एक निर्जीव कोलाज आहोत बाकी काही नाही. आपल्यातलं डोळे दिपून टाकणारं तेज केव्हाच अस्ताचलास गेलंय.