माणूस कायम सुखाच्या शोधात असतो. आपली अख्खी हयात तो याच एका गोष्टीच्या मागे फिरत असतो. तो कधी आपल्या कामात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, कधी यशामध्ये, कधी आपल्या कुटुंबियांच्या सहवासात. सुख हे असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आणि वेगवेगळ्या क्षणांमध्ये विखुरलेलं असतं. ते पाण्यासारखं प्रवाही असतं. ते एकगठ्ठा कधीच हाती लागत नाही. कितीही तहान लागलेली असली तरी आपल्याला एकेक घोटच पाणी प्यावं लागतं तसंच सुखाचं आहे. ते जसं येईल तसं थोडं थोडंच उपभोगीत जावं यातच त्याची गोडी असते. त्याला घट्ट धरून ठेवण्याचा अट्टाहास नसावा.