का कुणास ठाऊक पण कविता, आठवणी अन पावसाळ्याचं एक अजब नातं आहे. कदाचित पानगळीनंतर येणाऱ्या पावसाळ्यात झाडांप्रमाणेच मानवी मनालाही चैतन्याची पालवी फुटत असते म्हणून असेल.
कवितेचं विश्व अमर्याद असतं. कविता वाचताना आपण प्रेत्येकजण आपापल्या अनुभवानुसार एक विश्व उभे करीत असतो. आपण आपल्याच आठवणींशी कवितेची सांगड घालण्याचा प्रयत्न करीत असतो. अन मनाच्या खोलवर कुठेतरी धुसरलेल्या आठवणीही हळूहळू डोकाऊ लागतात. मग आपण अलगद त्या आठवणींच्या रम्य प्रांती जातो. अन त्या आठवणीही अशा कि एकीसोबत दुसरी येते मग तिसरी. असं खूप वेळ चालत जातं. मला म्हणाल तर आठवणींच्या राज्यातून बाहेरच यावंसं वाटत नाही. तिकडेच रमावंसं वाटतं. मस्त कविता वाचाव्या अन आठवणी अन स्वप्नांच्याच दुनियेत रमून जावं तासन-तास. पण इकडेही कर्तव्य असतं आपली वाट बघत अन मोठ्या मुश्किलीनं इकडे परतावं लागतं.
इथे ना धो महानोरांच्या "पावसाळी कविता" या कवितासंग्रहातली एक कविता मला आठवते
पाऊस येताना घेऊन येतो दर सालच्यावाणी
हिमगर्द वर्षावात भिजून जाणारी पावसाची गाणी
तरंगत जाणाऱ्या डोळ्यांच्या हिंदोळ्यात हळुवार सावनी
सावल्यासावल्यांनी उतरून येणाऱ्या जुन्या आठवणी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा