पृष्ठे

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

भुतं


बऱ्याच गावांत असतात तशी आमच्याही गावातसुद्धा काही (ग्राम देवतांसाराखी) ग्रामभुतं आहेत आणि त्यांच्या काही आवडत्या जागा आहेत. त्या जागांची नावे घेताच भीती वाटायला लागते. आमच्या शेताच्या जवळ कॅनॉलच्या दिशेला भगवती म्हणून असंच एक भुतांचं वसती स्थान आहे.  दुरून बघितल्यावर कसल्या तरी टेकड्या दिसतात तिकडे.  खरं तर तो भाग दिवसाही निर्जन असतो आणि रात्री तर फारच भयावह होतो.  तिकडे कुणाकुणाला भुताने दर्शन दिल्याचं ऐकिवात आहे. ती भुतं कॅनॉलमध्ये वाहून आलेल्या लोकांची असावीत असं म्हटलं जातं. पण त्या वाहून आलेल्या प्रेतांना आमच्याच गावी का म्हणून मुक्काम करावासा वाटतो हे एक कोडंच आहे.  अजून अशीच एक जागा म्हणजे आमच्या गावच्या जवळच एक ओढा आहे आणि त्यावर पूल आहे. या भागाला कट्टा म्हणतात. जवळ बरीचशी वडाची झाडे आहेत. त्यामुळे तिथे दिवसाही अंधार असतो. तिथेही काही जणांना भुतांनी दर्शन दिलंय असं म्हणतात. आणखी आवईकडे जाणाऱ्या रस्त्यावर दूर कुठेतरी दिसणाऱ्या एका आंब्याच्या झाडावरसुद्धा एक भूत आहे म्हणतात. परत आमच्या मळ्यात खोकाड्या विहिरीत कुणा जीव दिलेल्या बाईचं भूत आहे म्हणतात. त्या विहिरीजवळच एक चिंचेचं झाड आहे ते भूत कधी कधी त्या झाडावरसुद्धा आढळून येतं.  तर भगवती, कट्टा, आंब्याचं झाड, खोकाडी विहीर, तिच्या जवळचं ते चिंचेचं झाड ही असली भूतांची वसती स्थानं. मला कळत नाही भुतं असल्या अवघड ठिकाणी म्हणजे झाडांवर, विहिरीत कशाला राहत असतील. 

या असल्या जागा प्रत्येक गावी असतात आणि देवादिकांच्या नाही तेवढ्या या भुतांच्या कथा सांगितल्या अन ऐकल्या जातात. कधीकधी काहीजण मंदिराच्या कट्ट्यावर किंवा चावडीवर बसून त्यांचे स्वतःचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे भूतदर्शन वर्णन करून सांगत असतात.आपण भूत कधीही पाहिलं नसलं तरीही त्याच्या विषयी काही प्राथमिक माहिती आपल्याला त्यातून मिळते. आणि सुदैवाने भूत दर्शन झालेच तर कोणते प्रोटोकॉल्स पाळायचे याचीही माहिती मिळते. या कथा ऐकायला सुरस वाटतात. पण मग त्या ठिकाणांहून जायची वेळ आली कि मी मी म्हणणाऱ्यांचीसुद्धा भीतीने गाळण उडते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा