पृष्ठे

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

पैलतीर

मागच्या मे महिन्यात घरी गेलो होतो, दर वेळी जातो तसाच. एके दिवशी सकाळी लवकर उठलो (जे आता फार क्वचित घडतं) आणि मग जाणवलं की इथे सगळं काही तसंच पूर्वीसारखं आहे. आई, अण्णा, बहिणाबाई सगळेच सकाळी सहाच्या आधी उठतात. सात वाजेपर्यंत सगळ्यांचं अंघोळ करून झालेलं असतं. सगळ्या खोल्या झाडून स्वछ झालेल्या असतात. आई अजून रोज अंगणात सडा टाकते, रांगोळी काढते, तुळशीची पूजा करते. हे तुळशीवृंदावनसुद्धा अगदी तेच आहे. अण्णा सकाळी सकाळी काळ्या कमानीकडे जाऊन भाजीपाला आणतात. पेपरवाला भल्या सकाळी येउन पेपर टाकून जातो. दहीवल्या मावशी अजून रोज सकाळी न चुकता दही घ्यायचं का म्हणून विचारतात. सगळ्याच अंगणांत साडे शिंपण चाललेलं असतं. शाळेत जाणाऱ्या मुलांची तशीच धावपळ चाललेली असते जशी माझी असायची. मीही असाच होतो काही वर्षांपूर्वी, शाळेत असताना. हे सगळं किती मस्त आहे. मला माझे शाळेचे दिवस आठवले. किती उत्साह होता जगण्यात तेव्हा. सकाळी सात वाजता शाळा भरायची आणि आम्ही साडेसहालाच घरातून निघायचो. (सकाळचे सहा वाजल्याचं घड्याळात पाहून आता युगं उलटली असं वाटतंय. ) मग दहावीचं वर्ष. दिवसभर शाळा, एक्स्ट्रा क्लासेस यात किती बिझी असायचो तरीही तरतरीत. हा वसमत रोड रोज सकाळी सकाळी किती प्रफुल्लीत वाटतो अजूनही. पण आता मला या सगळ्यापासून खूप दूर आल्यासारखं वाटतंय. स्वतःच्याच प्रश्नांमध्ये इतका गुरफटत गेलो कि या गोष्टींकडे लक्षच राहिलं नाही. आपल्या प्रश्नांच्या पलीकडेसुद्धा जग आहे आणि ते खूप सुंदर आहे हे भानच राहिलं नाही. पण हे लवकर लक्षात आलं हेही नसे थोडके. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा