कोणतीही संस्कृती, धर्म, भाषा किंवा विचारसरणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जाते तेव्हा ती जशास तशी तिथल्या जनमानसात रुजावी हे शक्य नाही. तिच्यामध्ये त्या ठिकाणानुसार बदल होणारच किंबहुना झालेच पाहिजे. नाहीतर भारतातल्या कम्युनिस्ट पक्षासारखी गत होते. ते फक्त भारतात राहतात, भारतीयांसारखे दिसतात, भारतीय भाषा बोलतात म्हणून भारतीय अन्यथा ते चीन किंवा रशियाच्या डोक्याने विचार करणारेच आहेत. हे तत्त्व बऱ्याच गोष्टींना लागू होते. स्थलकालसापेक्षता नावाची एक गोष्ट असते हे काही महाभाग विसरतात. भारतात असलेल्या सगळ्याच धर्मांनासुद्धा स्थितीशीलता आलेली दिसते. प्राचीन भारताच्या वैभवाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण इथल्या तत्कालीन सर्वसमावेशक समाजव्यवस्थेला, राज्यव्यवस्थेला, धर्मव्यवस्थेला विसरतो. आता आपले धर्म, समाज, राज्यव्यवस्था, प्रशासन सर्वांनाच एक प्रकारची मरगळ आली, त्यांमध्ये ताठरपणा आलाय हे दिसून येतं. मला वाटतं आपण नावाला स्वतंत्र आहोत बाकी आपल्या मनमनावर कसल्या ना कसल्या संकुचित विचारांचा, मतांचा प्रभाव आहेच. ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरीच नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा