काही वेळापूर्वीच ढग आले, हवेतला कोरडेपणा जाऊन थोडासा दमटपणा आला, वारा वाहायचा थांबला, ढग एक एक करून आकाशात गर्दी करू लागले मग झाकोळून आलं-अगदी अंधारून-आणि सर्वांनी मिळून एकच ठराव संमत केला. त्याच्या जल्लोषात सर्वांनी कडकडाट केला आणि एकच वर्षाव सुरु झाला. आता लहान मोठे थेंब वेगाने जमिनीवर येत आहेत. बाणांच्या वर्षावासारखे. झाडांना,त्यांच्या आश्रयाला असलेल्या पक्ष्यांना, पानांना, गवताच्या पात्यांना, फुलांना, घरांना, रस्त्यांना, वाटांना, त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अगदी सर्वांनाच चिंब चिंब भिजवून ते थेंब जमिनीवर ओघळत आहेत. सृष्टीला न्हाऊ घालत आहेत. चैतन्याचाच वर्षाव हा. झाडांच्या ढाली फुटून गेल्या आहेत. त्याखाली आश्रय घेतलेली माणसे आता दुसरा आश्रय शोधत आहेत. होस्टेलच्या गच्चीवर स्वैर संचार करणारी माकडं बिचारी आपल्या पिलांसहित कुठे लपून बसली कुणास ठाऊक. galleryला असलेल्या लोखंडी गजांच्या खाली थेंबांची एक रंगच तयार झाली आहे. पलीकडचा निसर्गाचं त्यांत सूक्ष्म प्रतिबिंब दिसतंय. हवेत मस्त गारवा आलाय. होस्टेलच्या पटांगणात असलेली सगळी झाडे पाणी पिऊन तजेला आल्यासारखी दिसतायत. जिकडे पाहावं तिकडे हिरव्याच हिरव्या रंगाच्या छटा. मध्येच कुठे कुठे पिवळा रंग डोकं वर काढून जणू निसर्गाच्या प्रगल्भतेची साक्षच देतोय. एकदम प्रसन्न वाटतंय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा