पृष्ठे

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

तो जायचा दिवस...

घरी असलं कि दिवस इतके लवकर निघून जातात कि घरी राहिल्यासारखं वाटतच नाही. अचानक तो जायचा दिवस समोर येउन उभा राहतो. त्याच्या आदल्या दिवशी तर एकेक क्षण हातातून निसटत असल्यासारखं वाटतं, काय करू अन काय नको असं होतं. मी ते क्षण धरून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करतो पण ते शेवटी निसटून जातातच आणि मग उदास रात्र पसरते साऱ्या जगावर आणि माझ्या मनातही. आणि इच्छा नसतानाही सामानाची बांधाबांध करावी लागते कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं असतं. पुन्हा कमीत कमी सहा महिने तरी हे घरी राहण्याचं सुख मिळणार नसतं. झोपही काही केल्या डोळ्यात उतरायला तयार नसते. मग मी या दिवसांत काय काय केलं, कुणाकुणाला भेटलो, कुठेकुठे गेलो याचं पुनरावलोकन होतं. काही गोष्टी केल्याचं समाधान असतं तर काही राहून गेल्याची खंत. आणि मग या विचारांच्या तंद्रीत केव्हा तरी अलगद झोपेच्या स्वाधीन होतो…आणि सकाळ होते. मग मोठ्या मुश्किलीने उठावंच लागतं. आई साखरझोपेत असलेल्या बहिणाबाईला मी जाणार म्हणून उठवते. आपल्यामुळे एवढ्या सगळ्यांना झोपेतून उठावं लागतंय याचं वाईट वाटतं, पण पर्याय नसतो. आई तर पहाटेपासूनच  उठलेली असते. सगळी आवराआवर करून शेवटी देव्हाऱ्यातल्या देवाला, आई-अण्णाला नमस्कार करून स्वारी निघते रेल्वे स्टेशनकडे. इतक्या दिवसांत पहिल्यांदाच इतक्या सकाळी उठल्यामुळे परभणीचं सकाळचं दुर्मिळ रूप नजरेस पडतं आणि परभणी अशीही असते हे पाहून आनंद वाटतो. बाहेर थंडगार हवा सुटलेली असते, वसमत रोड अजून काहीसा पेंगतच असतो, वाहनांची गर्दी व्हायला अजून अवकाश असतो आणि  नाही म्हणायला जॉगिंगवाल्यांची वर्दळ असते, खानापूर फाट्याजवळच्या कृष्ण मंदिरातल्या कृष्णाला मी दुरूनच नमस्कार करतो, काळ्या कमानीला अन गुलमोहर हॉटेललासुद्धा अजून जाग आलेली नसते, त्यापुढे पेट्रोल पंप अन शिवाजी कॉलेजसमोरचे कॉम्प्लेक्स निपचित असतात आणि त्यासमोर अजून झोपेतच असलेलं गार्डन दिसतं, मग अजून पुढे शिवाजी पुतळा आणि बी. रघुनाथ सभागृह शांतपणे उभे असलेले दिसतात आणि रेल्वे स्टेशन आल्याची चाहूल लागते. हे सगळं मी डोळ्यांत साठवून ठेवत असतो आणि पुढच्या खेपेला रोज सकाळी लवकर उठून हे सगळं अनुभवायचा निश्चय करून टाकतो. 

असंच आयुष्याचंसुद्धा असावं. आयुष्याच्या संध्याकाळी किती विचार येत असतील मनात, नाही का? तिथे तर काहीच बरोबर येणार नसतं, आठवणीसुद्धा नाही आणि परत यायचीसुद्धा सोय नसते. ते जाणं कायमचंच असतं.  इतके दिवस ज्यांच्या सहवासात घालवले ती माणसे; जिथे राहिलो, जगलो ते घर, तो परिसर; हे जग; अगदी सगळंच काही सोडून जावं लागणं ही कल्पनाच किती भयंकर आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा