पृष्ठे

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

दुनियादारी: कादंबरी आणि चित्रपट

काल दुनियादारी चित्रपट पहिला. आणि साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी जेव्हा दुनियादारी रिलीज झाला होता तेव्हाच दुनियादारी ही कादंबरी वाचली. चित्रपट आणि कादंबरी दोन्हीही अप्रतिम आहेत. चित्रपटासाठी मूळ कथेत काही मुलभूत बदल केले आहेत पण ते कुठेच अनाठायी वाटत नाहीत. उलट चित्रपट हिट होण्याचं बरचसं श्रेय त्या बदलांनाच द्यावं लागेल. 

कादंबरी सुरु होते ती श्रेयस पुण्यात आल्यावर आणि मग श्रेयसभोवती फिरते. चित्रपट सुरु होतो म्हातारे शिरीन आणि प्रितम श्रेयसला भेटायला म्हणून पुण्याला जायला निघतात तेव्हा. खरं तर कादंबरीमध्ये श्रेयस किंवा कुणीच म्हातारं होत नाही म्हणजे त्याआधीच कादंबरी संपते. कादंबरीमध्ये गुजराती असलेली शिरीन आणि प्रितम पटेल ही भावंडं चित्रपटात चक्क शिरीन आणि प्रितम घाटगे अशी मराठी होतात आणि त्यांची पार्श्वभूमी सुद्धा राजकीय दाखवली आहे. त्यांचे वडील राजकारणात असल्याचं दाखवलंय. कादंबरीत एक साधा मवाली असलेल्या साईलासुद्धा चित्रपटात राजकीय पार्श्वभूमी मिळते आणि त्याच्यातला विलन अजून पॉवरफुल होतो. या दोन्ही बदलांना पुढे मोठ्या खुबीने एकमेकांत गुंफलंय.  जेव्हा साई आणि शिरीन यांचं लग्न ठरल्याचं कळतं तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. म्हणजे शिरीन आणि प्रितम ही भावंडं कट्टा gangचे फ्रेंड्स आणि त्या शिरीनचं लग्न कट्टा gangचा जानी दुश्मन असलेल्या साईशी? पण हा बदल जमून गेलाय. कादंबरीत श्रेयस मिनुच्या प्रेमात आपण होऊन पडतो. पण चित्रपटात तो नाटक करत असल्याचं चित्रण आहे हे जरा खटकतं. असो. नंतर सगळ्यात मोठा बदल म्हणजे चित्रपटात चक्क श्रेयस आणि शिरीनचं लग्न होतं. कादंबरीत असलं काहीही होत नाही,सगळे आपापल्या मार्गाने निघून जातात. चित्रपटात एम. के.ला जास्त महत्त्व नाही दिलं आणि ते एका दृष्टीने बरंच झालं कारण कादंबरीतही जेव्हा एम.के. आणि श्रेयस यांचा संवाद येतो तेव्हा कादंबरीचा पेस मंदावल्यासारखा वाटतो.  पण कादंबरीत दारू ढोसून मारणाऱ्या एम के ने चित्रपटात आत्महत्या का केली हे कळत नाही. आणि चित्रपटाचा शेवट तर अगदी यू टर्नच आहे- शेवटी श्रेयस मरतो. पण हा एंड सुद्धा जमून गेलाय. कारण चित्रपट संपल्यावर काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं. 

सर्वांचाच अभिनय अगदी अप्रतिम आहे. दिघ्याच्या रोलमध्ये अंकुश चौधरी अगदी परफेक्ट बसतो, स्वप्नीलने साकारलेला श्रेयस, शिरीन झालेली सई, उर्मिला कानेटकरने साकारलेली निरागस मिनू, जितू जोशीचा साई सगळे आपापल्या भूमिकांमध्ये योग्य वाटतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा