पृष्ठे

शनिवार, ३१ मार्च, २०१२

क्षण


भविष्यात सगळं काही मस्त, आनंदी-आनंद वगैरे दडलेलं आहे आणि हा वर्तमान तेवढा खडतर असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आणि एकदा का हा काळ संपला कि मग आयुष्य कसं मजेत जगता येईल या भाबड्या आशेनं आपण हाती असलेला सोनेरी क्षण जगायचं सोडून धावत सुटतो . आणि जेव्हा आपण आपल्या इच्छित क्षणापर्यंत पोहोचतो तेव्हा लक्षात येत कि इथे तर काहीच वेगळं नाही सगळं काही तसंच आहे. उलट काही मोठे प्रश्नही आहेत स्वागत करायला. पण केव्हातरी आपल्या हाती असलेले क्षणही आता आपले राहिलेले नसतात. त्यांच्या आठवणी झालेल्या असतात किंवा त्याही नाही कारण ते आपण जागलेलोच नसतो. त्या क्षणांसोबातच कदाचित इतरही बरंच काही गमावलेलं असतं आपण पण याची जाणीव होण्याइतकीही उसंत घेत नाही आपण. आणि एवढं सगळं होऊनहि आपण परत धावतच राहतो हातचं सोडून पळत्यापाठी. आणि मग कुठल्यातरी क्षणी आपल्या लक्षात येत कि आता आपले इथले सगळेच क्षण संपलेत आणि जगायचं तर राहूनच गेलं. अशा वेळी धावायचं थांबवतो आपण कारण पुढे काहीच नसतं धावण्यासाठी. म्हणजे क्षण तर असतातच पण ते आपले नसतात. मग आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येत कि  आयुष्यातल्या त्या सोनेरी क्षणांसोबातच दूर कुठेतरी आपली जिवाभावाची माणसेही हरवली आहेत जी अशा सांजवेळी आपल्यासोबत असायला हवी होती. आणि जी आपल्यासोबत असतात ती त्यांच्या भविष्याचा वेध घेत धावत असतात, जसे आपण धावलो, जगायचं सोडून. पण हा साक्षात्कार व्हायला सगळे क्षण संपायलाच हवेत का? आयुष्यातल्या एक दोन प्रसंगातूनही असं होणार हे कळून येतंच की. तासाच प्रसंग (म्हणजे काही फार भयंकर वगैरे नाही , आपण ज्याला enlightening  incidence वगैरे म्हणू तसा) काल घडला. आणि झोपताना विचार करत होतो तेव्हा लक्षात आलं की अरे आपलं हे नेहमी असंच  होत आलंय. मग ठरवलं की हातात आलेला प्रत्येक क्षण जागायचा. आयुष्यात आलेली माणसं जपायची. म्हणजे शेवटी आपण आयुष्यातले बरेच क्षण जगलो असं समाधान तरी असेल. आणि हे असं फक्त त्या शेवटच्या क्षणी मिळणाऱ्या समाधानासाठीच करायचं असं  नाही. एकदा का आपण प्रत्येक क्षण जगायला लागलो की मग आपण  जिच्यासाठी म्हणून धावत होतो ती गोष्ट त्या प्रत्येक क्षणांमध्ये सापडते. आणि मग आपण आपला शेवटचा क्षणही जगतो. तोही अगदी मनसोक्त...........!

२ टिप्पण्या: